best summer drinks : नुकतेच गुलाबी गुलाबी थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाळा म्हणजे गरमी , वारंवार लागणारी तहान आणि कडाक्याचे ऊन. या कडक उन्हामुळे पचन शक्ती मंदावते. तसेच तापमान खूप उष्ण असल्याने बऱ्याच लोकांना हे वातावरण सूट होत नाही आणि अनेक तक्रारींना त्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे उन्हाळा बऱ्याच जणांना आवडत नाही. सूर्यदेव आपल्यावर रागावून इतक्या कडक उन्हाची शिक्षा आपल्याला देतात की काय असे वाटावे इतके कडक ऊन पडते.
या उन्हाळ्यात उष्णतेचा जास्त त्रास होऊ नये, सगळ्यांनाच उन्हाळा सुसह्य जावा यासाठी काही विशेष शीतपेय आणि खाताना घ्यावयाची काळजी कशी घ्यावी ते बघुया.
उन्हाळ्यात आपल्याला खूप तहान लागते. उष्णतेमुळे जास्त घाम येतो त्यामुळे शरीरातील पाण्याचा अंश कमी होऊन तहान लागते. ती तहान भागवण्यासाठी मग आपण कृत्रिम शीतपेय आणि फ्रिज मधील पाणी पिऊन तहान भगवण्याच प्रयत्न करतो. आपली तहान भागते आणि काही वेळ बरेही वाटते पण हे तात्पुरते असते. थोडावेळ तहान भागली असे वाटले तरी पुन्हा काही वेळाने पाणी पिण्याची इच्छा होते. हे शीतपेय आणि फ्रिज मधील पाणी पिल्याने आपल्या शरीरातील उष्णता अधिक वाढून अजुनच तहान लागते शिवाय या कृत्रिम शीतपेयचे घातक परिणाम आपल्या शरीरावर होतात. त्यामुळेच अतिथंड पेयाच्या आहारी न जाता साध्या सोप्या नैसर्गिक पेयाचा वापर करायला हवा. जी पेय शरीरातील पाण्याचे संतुलन ठेवण्यास मदत करतील आणि त्याचे शरीरावर कसलेही विपरीत परीणाम होणार नाहीत.
मग कोणती आहेत ही पेय ?? तर ही पेय अगदी आपल्या सर्वांच्या घरात सहज उपलब्ध असलेल्या घरगुती सामनापासून बनवता येतील अशी आणि सगळ्यांच्याच खिशाला परवडतील अशीच आहेत.
१. लिंबाचे सरबत :
माठातील गार पाण्यात लिंबू पिळून त्यात मीठ, साखर आणि चवीपुरते सोडा घालून सरबत घेतले तर तोंडाला चव चांगली येते. तसेच पचनशक्ती सुधारते. त्यामुळे घरातील पदार्थापासून बनलेले हे लिंबू सरबत आपण उन्हाळ्यात घेऊ शकतो.
२. शहाळ्याचे पाणी (coconut water) :
उन्हाळ्यात आपल्या शरीरातील पाणी घामामुळे कमी झालेले असते तसेच क्षारांची कमतरता कमी झालेली असते. अशावेळी शहाळ्याचे पाणी अगदी सलाईन सारखे काम करते. उन्हामुळे जर उलट्या, जुलाब त्रास होत असेल तर त्यावरही हे पाणी उपयोगी ठरते.
३. कैरीचे सरबत ( पन्हे ) :
यासाठी कैरीला चांगल्या पद्धतीने सोलून त्यामधील कोय काढून गरम पाण्यात उकळून घ्या. नंतर त्यात काळे मीठ, चाट मसाला, पुदिना आणि साखर घालून मिक्सर मध्ये जुस करून त्याचे सेवन करा. उन्हाळ्यात पाहुणचार करण्यासाठी आपण याचाच उपयोग करतो. कैरी थंड असल्याने उष्णता कमी करते आणि थंडावा देते. त्यामुळे उन्हाळ्यात हे पन्हे खास उपयुक्त आहे.
४. उसाचा रस (sugarcane juice):
हे उन्हाळ्यात उपलब्ध असलेले आणखी एक खास शीतपेय. ऊसाचा रस सर्वानाच खूप प्रिय असतो. पण उन्हाळ्यात त्याचे सेवन करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. उन्हाळ्याच्या अगदी सुरुवातीला हा रस घेऊ नये. कडक ऊन पडू लागल्या नंतर आठवड्यातून दोन दिवस घ्यावा. ज्यांना कफ आणि दम्याचा त्रास आहे अशांनी हा रस घेणे टाळावे. जास्त पाण्यात हा रस घेऊ नये. तसेच यासाठी वापरण्यात येणारा ऊस स्वच्छ असावा शिवाय बर्फ न घालता याचे सेवन करावे.
नक्की वाचा
चेहरा उजळण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा.
५. लिंबू पाणी :
मठातील गार पाण्यात लिंबू टाकून दिवसातून दोन वेळा जरी प्यायलात तर ते खूप उपयुक्त ठरते उन्हाळ्यात. लिंबू पाणी शरीरातील पाण्याची पातळी समांतर ठेवते. नैसर्गिक एनर्जी देते तसेच शरीरातील नको असलेले घटक बाहेर टाकते. शरीर स्वच्छ ठेवण्यास मदत करते.
६. ताक ( दही ) :
दह्यात मीठ, जिरे पावडर आणि हिंग घालून चांगले फिरवून घ्या. हे दही किंवा ताक प्यायल्याने पोटात एकदम शांत वाटते आणि पित्त दूर होते.
७. पुदिना सरबत :
उन्हाळ्यात होणारा पोटाच्या त्रासापासून हे पुदिना सरबत वाचवते. त्यासाठी मिक्सर मधून पुदिना, साखर,मध, काळे मीठ, मिरपूड आणि जीरा पावडर चांगले वाटून घ्या. ही तयार झालेली पेस्ट कमी पाण्यात मिक्स करून प्या.
८. कोकम सरबत :
याची चव उत्तम आहेच शिवाय हे यकृतासाठी खूप चांगले आहे. तसेच पिण्याचे समाधान मिळते आणि शरीराला ही फायदेशीर ठरते.
९. माठतील पाणी :
हे पाणी उन्हाळ्यात सगळ्यांच्याच घरात असतेच असते. ग्रामीण भागात तर आजही प्रत्येकाच्या घरात फ्रिज ऐवजी माठातिल पाण्याचा वापर केला जातो आणि तो सुद्धा अगदी बाराही महिने. हे पाणी पाण्याची तहान भागवते शिवाय मन शांत करते, शरीराची हानी भरून काढते. या माठात जर मोगऱ्याची फुले किंवा वाल्याची पुरचुंडी घालून ठेवल्यास हे पाणी सुवासिक होते आणि मन उत्साही होते.
१०. फळांचे रस :
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे अनेक फळं बाजारात उपलब्ध असतात. यात कलिंगड, द्राक्षे,आंबे यांचा समावेश आहे. द्राक्षांचा रस हा बळ वाढवणारा आणि शुक्र धातू यांनाही वाढवणारा आहे. तसेच हा रस बऱ्याच वेळासाठी तहान भगवतो. या सोबतच संत्री आणि मोसंबी रसही खूप उपयुक्त ठरतात.
११. उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्यात साखर किंवा मीठ घालून तयार केलेले साधे पाणीही एनर्जी देते. तहान भागवते त्यामुळेच उन्हाळ्यात उपयोगी ठरते. ज्या लोकांना खूप घाम येतो त्यांनी हे पाणी आवर्जून प्यावे. यामुळे पाण्याचे शरीरात असंतुलन होणार नाही.
ही सगळीच पेये अगदी घरच्या घरीच बनवता येतील अशीच आहेत. बाहेरील केमिकल युक्त कोल्ड ड्रिंक्स पिण्यापेक्षा हे पेय बनवून आपण ती घेऊ शकतो. यामुळे आपली तहान भागेल आणि आरोग्य खूप चांगले राहील.
=====================