
शार्ली ने तर आईसाहेबांच्या मनात जागा करण्याचा विडा उचलला खरा पण खरंच पेलवेल शार्लीला…कारण शार्ली ही एक अतिशय आळशी आणि उनाडक्या करणारी मुलगी असते…शार्ली ला माधव मध्ये काहीच रस नसतो…शार्लीला इंटरेस्ट असतो ते फक्त माधवच्या संपत्तीत म्हणून शार्ली घरंदाज होण्याचं फक्त नाटक करत असते…आईसाहेब ह्या राजकारणी आणि पारखी नजरेच्या असल्यामुळे शार्लिविषयी आधीपासूनच शंका करत असतात माधवलाही आईसाहेब कानीकपाळी ओरडून सांगत पण शार्लिबद्दल वाटणार प्रेम माधवला स्वस्थ बसून देत नव्हतं म्हणून आईसाहेबांनीच शार्ली ची परीक्षा घेण्याचं ठरवलं….दुसऱ्याच दिवशी शार्ली आपल्या अंगावर साडी नेसलेली दिसली…म्हणून माधव ने आपल्या गर्ल फ्रेंडच कौतुक केलं खरं पण साडी नेसली तरी ती वागवायची कशी हे शार्ली ला माहिती नव्हतं…चालत असतानाच पाय अडकून शार्ली जमिनीवर पडली सावरायला माधव आला खरा पण आईसाहेबांना हे अजिबातच रुचलं नाही त्या फाडदिशीन म्हणाल्या-
आईसाहेब – माधव…काय करतोस तू….तिची अंघोळ झालीय…तू अजूनही पारोसाच आहेस मग तिला कशाला शिवलास…
माधव – आईसाहेब…अहो ती साडीत पाय अडकून पडली म्हणून मी तिला आधार म्हणून सावरायला गेलो…बस एवढंच…
आईसाहेब – माधव…उगाच तिची बाजू घेऊ नकोस…सवय नाहीय ना साडी नेसण्याची…मग असं होणारच…
शार्ली – आईसाब…मी साडी खरंच कधी घातली नाहीय…मी गोवन आहे…तिथं साडी असलं कल्चर फक्त एक हौस म्हणून करतो आम्ही…पण सावकाश हॅबिट होऊन जाईल मला साडी घालण्याची….
आईसाहेब – बाई….बाई…गोवन संस्कृतीमध्ये साडी हा काय घालण्याचा प्रकार आहे की काय….पोरी अगं…साडी ही नेसत असतात…साडी नेसतात…! साडीच जाऊ देत बाकी चहा-नाश्त्याचा काय…मला सकाळीच ८ वाजता चहा लागतो म्हणजे लागतो…आता साडेआठ होत आले आहेत…
शार्ली – आईसाब…मी घेऊनच आले..एका मिनिटात…[शार्ली साडी सावरत चहा आणायला जाते ] आईसाब हे घ्या तुम्हाला पाहिजे तसा चहा…
आईसाहेब – [ चहाचा एक घोट घेतात ] शैइइइइइइइ …..काय चहा केलाय…तुला साधा चहासुद्धा करता येत नाही….तुझा हात माझ्या पोराच्या हातात द्यायचं म्हणजे फार मोठं दिव्यच आहे माझ्यापुढं….मनीषा हिला सांग मला चहा कसा लागतो ते…हम्म…घेऊन जा परत हा चहा…आज बाहेरच चहा घेईन मी…आणि ऐक…तुझं नाव काय…शार्ली हो ना…
शार्ली – हो आईसाब…
आईसाहेब – आत्ता मी दौऱ्यावर जातीय…दुपारी येईल परत तेव्हा मटकी उपसून ठेवेल ही मनीषा तू भाजी करायचीस…आणि भाकरी कराव्या लागतील…दुपारच्या जेवणात थोडासा भातही असू देत लोणचं केलेलं आहेच…ते आठवणीने वाढ ताटात म्हणजे झालं….सर्वात महत्वाचं मला दुपारी जेवणाआधी एक गोळी घ्यायची असते ती काढून दे म्हणजे झालं…मी निघतेय….माधव येते रे मी….काळजी घे…
आईसाहेब निघून गेल्या…आईसाहेबांना परत येईपर्यंत दुपार होणार म्हणून म्हणून शार्ली लगबगीने स्वयंपाकघरात जाते पण तिथे काहीच शार्ली ला जमत नाही…सगळं स्वयंपाकघरात पीठ आणि धुराचं साम्राज्य पसरलेलं असत…या गडबडीत आपल्या बॉय फ्रेंडला म्हणजेच माधवला साधं नाश्ताही शार्ली देऊ शकली नाही…
माधव – शार्ली….मला ब्रेकफास्ट देतेय ना…
शार्ली – बेबी…आज प्लीस बाहेरून ऑर्डर कर ना…खूप काम आहेत…
माधव – शार्ली…काय हा सगळा पसारा…ब्रेकफास्ट मी करतो मॅनेज बाहेरून ऑर्डर करतो…पण तू काही खाल्लं आहेस कि नाही…
शार्ली – नाही बेबी…तू ऑर्डर करशील तेव्हा माझ्यासाठीही ऑर्डर कर….
माधव – ठीक आहे तू हे सगळं आवर…आई येईलच….बरं…दुपारच्या लंच च काय झालं…नाही जमत ना तुला…!
शार्ली – नाही ना बेबी…माझा अवतार पहा ना कशी दिसतीय मी…मग लंच च काय करायचं…
माधव – मनीषा कुठं गेलीय कुणास ठाऊक…
शार्ली – ती ग्रोसरी च सामान आणायला गेलीय…
माधव – ओह्ह्ह…तिची जायची काय गरज होती…मला आता लंच सुद्धा बाहेरून मागवायला लागणार…
शार्ली – ठीक आहे…तोपर्यंत मी चेंज करून येते…
माधव ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण ऑर्डर करतो….ऑर्डर येताच दोघेही नाश्ता करून घेतात तोपर्यंत साडेअकरा वाजलेले असतात…शार्ली सगळी काम तशीच ठेवते…त्याच सुमारास मनीषा सामान घेऊन येते…मटकी उपसून ठेवलेली पाहते आणि लागलीच भाजी करूनसुद्धा टाकते…दुपारचं जेवण ऑर्डर केलंय हि गोष्ट मनीषाला माहिती नसते पण मनीषाचं काम होईपर्यंत शार्ली झोपी गेलेली असते…सगळा पसारा मनीषा अगदी जबाबदारीने आवरून ठेवते…तरीही शार्ली झोपलेलीच असते काही वेळातच आईसाहेब दौऱ्यावरून घरी येतात…सगळं घर अगदी टकाटक पाहून आईसाहेब अचंबित होतात…शार्ली ला शाबासकी देणार एवढ्यात त्यांची नजर दुपारच्या पार्सल वर पडते…आईसाहेब शार्लिच कौतुक करण्यासाठी घरभर शोधात असतात पण झाला सगळा प्रकार मनीषा आधीच आईसाहेबांना सांगून टाकते आणि आपलं नाव येऊ नये असंही मनीषा आईसाहेबांना मनवते आईसाहेबांच्या रागाचा पारा चढतो…आईसाहेब मोठ्याने ओरडतात…
आईसाहेब – शार्ली…..शार्ली….दिवसाढवळ्या झोपा काढतेस….घरात पाहुण्यांचा राबता असतो माहिती आहे ना तुला मग झोप आवरता येत नाही का तुला…
आईसाहेबांच्या आवाजाने शार्ली दचकून जागी होते…आणि बिछान्यावर उठून बसते…आणि दिवाणखान्यात येऊन आईसाहेबांसमोर अर्धवट झोपेच्या अवस्थेत उभी राहते…
शार्ली – आईसाब…काय झालं…?
आईसाहेब – पार्सल कुणी ऑर्डर केलं…?
शार्ली – ते माधवनेच ऑर्डर केलंय…
आईसाहेब – माधवने…तुझ्याच सांगण्यावरून केलं असणार ऑर्डर…मग तू केलं काय दिवसभर…
शार्ली – [ खाली मान घालून उभी असते ] आईसाब…मीच ऑर्डर केलं जेवण…मला नाही बनवता आलं…हे किचन नवीन आहे माझ्यासाठी म्हणून नाही जमलं मला …
आईसाहेब – बाई असली ना…किचन असो किंवा मातीची चूल तिच्यासाठी नवीन काहीच नसत…कारण अन्नपूर्णा प्रत्येक बाईत असतेच असते…आता तुला त्यात तिळमात्रही रस नाही…मग ‘नाचता येईना अंगण वाकडं‘ अशी गत झालीय तुझी….माधव…माधव…बाहेर ये…[ माधव बाहेर येतो ]
माधव – काय झालं आई…
आईसाहेब – तुझं लग्न हिच्याशी होऊ शकत नाही…
माधव – आई…अजून तर एकाच दिवस झालाय तुझ्या अटीचा…अजून सात दिवस आहेत…
आईसाहेब – मग सात दिवस असच सहन करायचं का मी…?
माधव – आई….अटीप्रमाणे तसं करावं लागेल…
आईसाहेब – ठीक आहे होऊ देत तुझ्या मनासारखं…
असं म्हणून आईसाहेब अजून सुधारण्यासाठी वेळ देतात पण आठही दिवस फोल ठरतात…शार्ली तसूभरही बदलत नाही….कारण तसं ती पदोपदी सिद्ध करत असते… आईसाहेबांना तर आपल्या मुलाच्या निवडीवर संताप व्हायला लागतो…म्हणून माधवशी खास शार्ली च्या बाबतीत बोलण्यासाठी येतात…
आईसाहेब – माधव…तू अजूनही विचार करावास असं मला वाटतं…
माधव – आई…शार्लिच्या बाबतीत अजूनही तुझी नकारघंटा का आहे..?
आईसाहेब – माधव…तिला या घराबाबत काहीच वाटतं नाही….सतत नटन मुरडणं…साधी राहणी आणि विचारसरणी श्रेष्ठ असं आपलं ब्रीद आहे…तसा कुठलाही लवलेश हिच्यामध्ये दिसत नाहीय….आठ दिवस झालेत तरीही जैसे थे…माझ्या औषधांच्या वेळा चुकवल्यात तिन…बजावून सांगितलं होत मी तिला….पण गाडी पुढे जातच नाहीय…मला तुझ्यासाठी घरंदाज बायको हवीय…. माधव – आई…पण तू असं नाही करू शकत सुधारायला तरी तिला वेळ दे ना…आता तिच्यासाठी इथलं राहणीमान ,वातावरण सगळंच नवीन आहे थोडा वेळ द्यावाच लागेल ना…
आईसाहेब – बरं…सात दिवसात काहीच बदल मला दिसला नाही ना…तर माझा शब्द तू पाळलाच पाहिजे..!
माधव – ठीक आहे… जर बदल झाला नाही झाला तर मी स्वतः तिला हाताला धरून बाहेर काढेल…मग तर झालं…!
आपल्या आईची रीतसर परवानगी घेऊन माधव शार्ली ला समजवायला जातो…
माधव – शार्ली…काय चाललंय तुझं…फोन वर सारखी-सारखी दिसतीय तू जास्त…आणि मी अलायचं कळताच कॉल बंद का केलास…
शार्ली – माधव….ओह्ह….माय डार्लिंग….तुला काय वाटलं…? मी कुणाशी बोलतेय….[माधवच्या गळ्यात हात टाकून ]
माधव – आता असं तू विचारल्यावर कसं काय चिडू मी तुझ्यावर…
शार्ली – माधव…कम ऑन…ये ना बस इकडे…मी ना माझ्या मॉडेलिंग बद्दल विचार करायचं ठरवलंय…
माधव – पण तुला या असल्या कामाची गरज नाहीय…तुला पैसे हवे असतील तर मी देतो …सर्वात महत्वाचं…
शार्ली – काय माधव…माझ्यापेक्षाही महत्वाचं काही आहे…
माधव – तुला आता आईने अजून ७ दिवसांची मुदत दिली आहे..तुला अजून खूप प्रॅक्टिस करावी लागणार आहे…तू मनीषाच्या मदतीने आणखी स्वयंपाक करण्याचा प्रयत्न कर…घर कसं चालवायचं हे शिक…
शार्ली – माधव…पण घर चालवायला पैसेही लागतात ना…
माधव – किती पैसे पाहिजे तुला सांग…
शार्ली – ५० थाऊसंड पाहिजे…
माधव – व्हॉट नॉन्सेन्स…एवढ्या पैश्याच तू काय करणार आहेस…घर चालवायला एवढे पैसे नाही लागत….पैशाने घर चालत असं नाहीय…एकमेकांना सांभाळून घेऊनही घर चालवता येत…तुला हवे तेवढे पैसे घे पण आईने तुझ्या चुका पोटात घालून तुला परत एक चान्स दिलाय तर त्याच सोनं कर….हे घे तुला पाहिजे तेवढे पैसे घे पण सात दिवसात घरातल्या माणसांना सांभाळ तेही प्रेमाने…
शार्ली – डार्लिंग….मी तुझ्यावर जितकं प्रेम करते….तितकंच या घरावरही करेल…माझं प्रॉमिस आहे तुला…
माधव – मग कालचे काही दिवस का बरं असं घर अस्ताव्यस्त करू ठेवलंस…त्याचंही काही नाही…तू तर काल आईला जेवणाअगोदरच्या गोळ्याही नाही दिल्यास…मग एवढंही तुला नाही जमलं मग कसं आई मला तुझ्या हातात सोपवणार…
शार्ली – तू माझा होणार नसशील ना तर हे घर माझं कसं होणार…तुझा माझ्यावर ट्रस्ट आहे ना मग नको काळजी करू मी घेईन सर्वांची काळजी…
असं म्हणून शार्ली माधवला गोड-गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढते पण शार्लिच्या मनात वेगळाच कट शिजत असतो तो कट म्हणजे आपल्या पहिल्या बॉयफ्रेंड च्या मदतीने माधवची सगळी संपत्ती गिळंकृत करायची …म्हणून दुसऱ्याच दिवशी पासून शार्ली घरातल्या कामामध्ये जातीनं लक्ष घालू लागते…मनीषाच्या मदतीने स्वयंपाकही शिकते…सगळे बदल पाच दिवसात घडतात….माधव हे सर्व पाहून अचंबित होतो आणि मनोमनी सुखावतोही…सगळी काम अगदी जिथल्या तिथं हे सर्व पाहून आईसाहेबही खुश होतात आणि स्वखुशीने माधव आणि शार्लिच्या लग्नाला परवानगी देतात…शार्ली ला कळते की आपल्या गोड बोलण्याने एवढा बदल होणार असेल तर आणखी गोड बोलून सगळा बिसनेस आपण आपल्या नावावर करू शकतो…म्हणूनच शार्ली लागलीच…पुढचा बेत आखू लागते…खरंच शार्ली चा बेत यशस्वी ठरेल की नाही ते पाहुयात पुढच्या भागात…

प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.
1 Comment
सौ. उषा शिरीष कुलकर्णी.
खुप छान