
आज माधुरी खूप खुश होती आज तिची मुले तारुण्याच्या उंबरठ्यावर विराजमान झाली होती..या अठरा वर्षाच्या काळात तिला आई होणे काय असते??या प्रश्नाचे उत्तर चांगलेच कळले होते. डिलिव्हरी नंतरच्या वर्षभरात तिला एकही दिवस नीट झोप मिळाली नव्हती…
रात्रीचे जागरण झाले तरी पुन्हा सकाळी लवकर उठून कामाला लागावे लागत होते कारण हातात आयता चहा देणारी आईच असते सासू नाही याची तिला पदोपदी जाणीव होऊन आईची ममता जागोजागी आठवत होती. ती मनोमन आईला थँक्यू म्हणत होती. आपल्या आईने ना जाणो किती रात्री आपल्यासाठी जागून काढल्या असतील ते आठवून तिच्या मनातील आईबद्दलचे प्रेम तिच्या डोळ्यांत तरळत होते .कधी नट्टापट्टा करण्यात दिवस घालवणारी ती आज केस विंचारायलाही वेळ काढू शकत नव्हती.तेव्हा तिची वेणी घालणाऱ्या आईची आठवण तिला बेचैन करत होती आज…..
कधीकाळी आपली आईसुद्धा अशीच आमच्यासाठी स्वतःला विसरली होती स्वतःसाठीचा वेळ तिने आम्हाला व्यवस्थित ठेवण्यासाठी दिला होता.मनोमन माधुरीने आईला पुन्हा थँक्यू म्हटले… स्वतःच्या पिल्लांना आधी जेवू घालून मग ती स्वतः जेवत असे..कधीकाळी आपल्या आईनेही अशा कितीतरी वेळा स्वतःच्या भुकेपेक्षा मुलांच्या भुकेला महत्त्व देत घालवल्या असतील या विचारांतून तिला आपल्या आईची ती प्रेमळ छबी आठवली आणि ती म्हणाली थँक्यू आई.. जेव्हा मुले थोडी मोठी झाली तेव्हा ती हे पाहिजे ते पाहिजे असे हट्ट करू लागली पण पप्पांनी प्रसंगी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या आमच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी याची जाणीव होऊन माधुरी भावूक झाली आणि आदराने तिने आपल्या पप्पांना थँक्यू म्हटले.पुढे मुले आणखी मोठी झाली आमच्याकडे हे नाही ..ते नाही.. म्हणत वडिलांना चार शब्द बोलू लागली पण पप्पांनी त्या शब्दांनी झालेल्या मनावरील जखमांना त्यांच्या कठोर रुपात लपवलं
आम्हाला वस्तूंची आणि शिस्तीची जाणीव करून देण्यासाठी आज जेव्हा तिला आणि तिच्या नवऱ्याला तिच्याच मुलांकडून या शब्दांच्या जखमा झेलाव्या लागल्या तेव्हा ती मनोमन तिच्या वडिलांना सॉरी म्हटली आणि आम्हाला शिस्तीचे धडे दिल्याबद्दल ती वडिलांना आज मनोमन थँक्यू म्हटली..आज जेव्हा तिची मुले तारुण्याच्या उंबरठ्यावर येवून उभी राहिली आणि आपल्याच मुलांच्या प्रश्नांचा भडीमारा होत असताना शांत राहून प्रसंगी मुलांच्या नजरेत वाईट ठरण्याची जाणीव होत असताना तिला आपल्या आई वडिलांना मनापासून थँक्यू म्हणावेसे वाटले प्रसंगी मुलांसाठी वाईट बनून मुलांना संस्कारांच्या बंधनात बांधत त्यांची वाट भरकटू दिली नाही आणि चांगल्या वाईटाची ओळख करायला शिकवले त्यासाठी….
आज जेव्हा म्हातारपणाची धूसर वाट दिसू लागली तेव्हा पदोपदी आपल्या आईवडिलांनी केलेल्या कितीतरी त्यागांची तिला आठवण झाली आणि तिने मनोमन त्यांचे आभार व्यक्त करत फक्त त्या दोघांसाठी एक ट्रीप अरेंज केली. दोघांना काहिक्षण एकमेकांसाठी देता यावेत म्हणून……..
आई वडील जेव्हा ट्रीपवरून परतले तेव्हा त्यांनी आपल्या मुलीच्या या गोड गिफ्टचे आभार मानन्याचा प्रयत्न करताच तिने त्यांना टोकले दोन्ही नवराबायकोने त्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि म्हणाले,”हसत हसत आपले जीवन आपल्या मुलांसाठी उधळून टाकणारी देवमाणसं दुसरी तिसरी कुणी नाही तर आई वडिलचं असतात .
थँक्यू मम्मी आणि पप्पा


मनु घोलप
लेखक