Ritbhatmarathi

Search
Close this search box.

स्वामी चरित्र सारामृत अध्याय ३ भावार्थसहित

॥ श्री गणेशाय नमः ॥ धन्य धन्य ते या जगती । स्वामीचरणी ज्यांची भक्ती । त्यांसी नाही पुनरावृत्ती । पद पावती कैवल्य ॥१॥ गताध्यायी कथा सुंदर । स्वामींनी निवेदिले स्वचरित्र । आणि बाबा दिगंबर । त्यांचे वृत्त निवेदिले ॥२॥ निर्विकार स्वामीमूर्ति । लोका चमत्कार दाविती । काही वर्षे करोनी वस्ती । मंगळवेढे सोडिले ॥३॥ मोहोळमाजी वास्तव्य करीता । आप्पा टोळ झाले भक्त । तेथीचे साकल्य वृत्त । अल्पमती केवी वर्णू ॥४॥ स्वामी चरित्राचे हे सार । म्हणून केला नाही विस्तार । वर्णिता कथा समग्र । ग्रंथ पसरे उदधीसम ॥५॥ सवे घेउनी स्वामींसी । टोळ जाती अक्कलकोटासी । अर्धमार्गावरुनी टोळांसी । मागे परतणे भाग पडे ॥६॥ टोळ आज्ञापिले सेवका । जोवरी आम्ही येउ का । तोवरी स्वामींसी सोडू नका । येथेच मुक्काम करावा ॥७॥ टोळ गेलिया परतोनी । स्वामी चालले उठोनी । बहुत वर्जिले सेवकांनी । परी नच मानिले त्या ॥८॥ तेथोनिया निघाले । अक्कलकोटाप्रती आले । ग्रामद्वारी बैसले । यतिराज स्वेच्छेने ॥९॥ तेथे एक अविंध होता । तो करी तयांची थट्टा । परी काही चमत्कार पाहता । महासिद्ध समजला ॥१०॥ पूर्वपुण्यास्तव निश्चिती । आले चोळप्पाचे गृहाप्रती । स्वामींसी जाणोनी ईश्वरमूर्ती । चोळप्पा करी आदर ॥११॥ चोळप्पाचे भाग्य उदेले । यतिराज गृहासी आले । जैसी कामधेनू आपण बळे । दरिद्रियाच्या घरी जाय ॥१२॥ पूर्वपुण्य होते गाठी । म्हणूनी घडल्या या गोष्टी । झाली स्वामीराज भेटी । परम भाग्य तयाचे ॥१३॥ धन्य धन्य तयाचे सदन । जे स्वामींचे वास्तव्यस्थान । सुरवरां जे दुर्लभ चरण । तयाच्या घरी लागले ॥१४॥ योगाभ्यासी योग साधिती । तडी तापडी मार्गी श्रमती । निराहार कितीक राहती । मौन धरिती किती एक ॥१५॥ एक चरणी उभे राहोन । सदा विलोकिती गगन । एक गिरीगव्हरी बैसोन । तपश्चर्या करिताती ॥१६॥ एक पंचाग्निसाधन करिती । एक पवनाते भक्षिती । कित्येक संन्यासी होती । संसार अवघा सांडोनी ॥१७॥ एक करिती किर्तन । एक मांडिती पूजन । एक करिती होमहवन । एक षट्कर्मे आचरिती ॥१८॥ एक लोका उपदेशिती । एक भजनामाजी नाचती । एक ब्राम्हण भोजन करिती । एक बांधिती देवालये ॥१९॥ परी जयाचे चरण । दुर्लभ सद्भक्तिवाचोन । केलियासी नाना साधन । भावाविण सर्व व्यर्थ ॥२०॥ योगयागादिक काही । चोळप्पाने केले नाही । परी भक्तिस्तव पाही । स्वामी आले सदनाते ॥२१॥ तयाची देखोनिया भक्ती । स्वामी तेथे भोजन करिती । तेव्हा चोळप्पाचे चित्ती । आनंद झाला बहुसाळ ॥२२॥ तैपासून तयाचे घरी । राहिले स्वामी अवतारी । दिवसेंदिवस चाकरी । चोळप्पा करी अधिकाधिक ॥२३॥ तेव्ही राज्यपदाधिकारी । मालोजीराजे गादीवरी । दक्ष असोनी कारभारी । परम ज्ञानी असती जे ॥२४॥ अक्कलकोटची प्रख्याती । तेव्हा काही विशेष नव्हती । परी तयांचे भाग्य निश्चिती । स्वामीचरणी उदेले ॥२५॥ तैपासून जगांत । त्या नगराचे नाव गाजत । अप्रसिद्ध ते प्रख्यात । कितीएक जाहले ॥२६॥ चोळप्पाचे गृहाप्रती । आले कोणी एक यती । लोका चमत्कार दाविती । गावात बात पसरली ॥२७॥ आपुली व्हावी प्रख्याती । ऐसे नाही जयांचे चित्ती । म्हणुनिया स्वामीराज यती । बहुधा न जाती फिरावया ॥२८॥ लोकांमाजी पसरली मात । नृपासी कळला वृत्तांत । की आपुलिया नगरात । यती विख्यात पातले ॥२९॥ राहती चोळप्पाचे घरी । दर्शना जाती नरनारी । असती केवळ अवतारी । लीला ज्यांची विचित्र ॥३०॥ वार्ता ऐसी ऐकोनी । राव बोलले काय वाणी । गावात यती येवोनी । फार दिवस जाहले ॥३१॥ परी आम्ही श्रुत पाही । आजवरी जाहले नाही । आता जावोनी लवलाही । भेटू तया यतिवर्या ॥३२॥ परी ते केवळ अंतर्ज्ञानी । ऐसी वार्ता ऐकली कानी । हे सत्य तरी येवोनी । आताच देती दर्शना ॥३३॥ रावमुखातून वाणी निघाली । तोचि यतिमूर्ती पुढे ठेली । सकल सभा चकित झाली । मति गुंगली रायाची ॥३४॥ सिंहासनाखाली उतरोन । राव घाली लोटांगण । प्रेमाश्रूंनी भरले नयन । कंठ झाला सद्गदित ॥३५॥ दृढ घातली मिठी चरणी । चरण धुतले नेत्राश्रूंनी । मग तया हस्तकी धरोनी । आसनावरी बैसविले ॥३६॥ खूण पटली अंतरी । स्वामी केवळ अवतारी । अभक्ती पळोनी गेली दूरी । चरणी भक्ती जडली तै ॥३७॥ सकळ सभा आनंदली । समस्ती पाऊले वंदिली । षोडशोपचारे पूजिली । स्वामीमूर्ती नृपराये ॥३८॥ निराकार आणि निर्गुण । भक्तांसाठी झाले सगुण । तयांच्या पादुका शिरी धरोन । विष्णू नाचे ब्रह्मानंदे ॥३९॥ इति श्रीस्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । प्रेमळ भक्त परिसोत । तृतीयोऽध्याय गोड हा ॥४०॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

                   श्री गणेशास स्मरून , स्वामींच्या चरणी ज्या ज्या भक्तांची श्रद्धा आहे , त्या सर्व भक्तांचा उद्धार असो , ते या जगात धन्य असोत , परत दुस्तर अशा संसारात त्यांची पुनरावृत्ती होऊ नये त्या सर्व भक्तांना मोक्ष मिळो    

           मागील अध्यायात कथा सुंदर होती कारण स्वतः स्वामी आणि बाबा दिगंबरांनी त्या कथेचे निवेदन केले होते , स्वामी म्हणजे निर्विकार ज्यांच्या स्वभावात , चेहर्यात कुठलाच बदल होत नाही त्यांच्या चमत्काराची महती सर्व विस्ताराने सांगणे कठीण स्वामी असेच आपले चमत्कार दाखवत मंगळवेढ्यास काही वर्ष वास्तव्यास राहिले मग तिथून पुढे आपला मुक्काम मोहोळ या ठिकाणी हलवला त्या ठिकाणी वास्तव्यास राहिले असता आप्पा टोळ हे स्वामींचे परमभक्त झाले त्या ठिकाणच्या स्वामींच्या लीला कशा वर्णाव्या कारण स्वामींच्या लीला विस्ताराने सांगावयाचे झाल्यास त्या समुद्राएवढ्या अथांग असतील म्हणून या अध्यायात संक्षिप्त स्वरूपात मांडतो आहे.

स्वामी चरित्र सारामृत अध्याय २

स्वामी चरित्र सारामृत अध्याय ४

                      पुढे आप्पा टोळ म्हणजे स्वामींचे भक्त स्वामींना घेऊन अक्कलकोटास आले पण आप्पा टोळ स्वामींना अक्कलकोटास सोडून परत अर्ध्या वाटेवरून आपल्या मोहोळ या गावी जावे लागले परंतु आपल्या सेवकास टोळ यांनी बजावले ‘ स्वामींना सोडून कुठे जाऊ नका , स्वामींना येथेच मुक्कामी राहू द्या ‘ सेवकांनी आपल्या मालकाची आज्ञा शिरसावंद्य मानून स्वामींच्या बाजूस थांबले , परंतु आपला भक्त जातोय हे पाहताच स्वामी तेथून तात्काळ उठले , सेवकांनी खूप प्रयत्न केला तरी स्वामी ऐकावयास तयार नाही म्हणून स्वामी तडकीने अक्कलकोटास आले आणि गावाच्या दारी म्हणजेच गावाच्या वेशीजवळच बसून राहिले , त्या ठिकाणी एक निंदा नालस्ती करणारा होता तो स्वामींना पाहताच त्याची थट्टा करू लागला परंतु स्वामींची लीला पाहून तो मनुष्यही थक्क झाला आणि स्वामींना खऱ्या अर्थाने जाणू लागला

स्वामींचे गतजन्मातील पुण्य कि काय…तिथूनच स्वामी चोळप्पाच्या घरी आले , स्वामींचा यथोचित असा आदर चोळाप्पाने केला , दारिद्र्याच्या घरी जेव्हा कामधेनू किंवा गायी अवचित जाते तसे चोळप्पाच्या घरी स्वामींचे राहणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचे अवतरणे असे होते , पूर्व जन्मीचे संचित म्हणूनच या भेटी गाठी पडायच्या असे म्हंटले पाहिजे , स्वामींचे चोळप्पाच्या घरी राहणे म्हणजे चोळाप्पाचे भाग्य थोर हे भाग्य कुणाच्याच नशिबी नव्हतं ते चोळप्पाच्या नशिबी होत म्हणूनच स्वामींचे वास्तव्य चोळप्पाच्या घरी झाले.   

           कुणी योगाभ्यास करून भक्ती साधतं , कुणी पायी चालून वारी करतं , कुणी उपास तापास करत असतं ,  कुणी मौन व्रत करेल , कुणी पर्वतावर बसून तप करेल , एका पायावर उभे राहून देवास आठवेल , कुणी वाऱ्यास गिळून भक्ती करेल , संसाराची दयनीय स्थिती करून कुणी देवास भजेल , कुणी कीर्तन निरूपण करून देवाचा धाव करतील , होम हवंन करून देवास आठवेल , कुणी भजन करताना नाचेल , कुणी ब्राह्मण लोकांसाठी जेवण बनवेल त्यांना जेऊ घालेन , देऊळ बांधून देवाची भक्ती साधेल परंतु हे सर्व करूनही मनात देवाविषयी भाव नसेल तर हे सर्व व्यर्थ जाणार . तर यापैकी चोळाप्पाने स्वामींसाठी काही केले नाही तर चोळाप्पाने अगदी साधेपणाने आणि मनोभावे स्वामींची सेवा करण्यास आरंभ केला हीच भक्ती स्वामींना अपेक्षित होती. त्याची भक्ती आणि मनोभावे केलेली सेवा पाहून स्वामी चोळप्पाच्या घरी भोजनाचा आनंद घेऊ लागले . त्याचवेळी मालोजीराजे राज्यपदाधिकारी या पदावर विराजमान झालेले होते कामात अत्यंत चोख आणि कणखर त्याचप्रमाणे सर्वज्ञानी असा नावलौकिक मालोजीराजांचा होता . त्याच वेळेला अक्कलकोट या नगराची ख्याती फार काही नव्हती परंतु जसे स्वामींचा पदस्पर्श त्या ठिकाणास झाला तशी त्या ठिकाणाची प्रसिद्धी वाढली .

         मालोजीराजांचेही भाग्य जणू स्वामींच्या चरणापाशी लिहिले गेले होते म्हणूनच तेव्हापासूनच अक्कलकोट हे प्रख्यात झाले . तर दुसरीकडे चोळप्पाच्या घरी कोण आलेय ? नाना चमत्कार दाखवत आहे अशी बातमी संपूर्ण गावभर पसरली . परंतु आपली ख्याती सर्वदूर पसरता कामा नये असे स्वामींना वाटे म्हणून स्वामी घराबाहेर किंवा गावभर फिरत नसे . स्वामींचा हा वृत्तांत राजाच्याही कानावर पडला , त्याचबरोबर आपल्याच राज्यातले चोळप्पाच्या घरी स्वामी राहत असल्याचीही खबर राजास समजली आणि गावातील स्त्री – पुरुष स्वामींना भेटण्याच्या हेतूने चोळप्पाच्या घरी जात आहेत हेही राजाच्या कानी आले म्हणून राजाच्या बोलीमधून सहज निघाले कि ,  ‘ कुणी दिव्य असा व्यक्ती आपल्या राज्यात येऊन फार दिवस झाले…. आतापर्यंत भेटण्याचा योग काही आला नाही परंतु आता भेटले पाहिजे ‘ असा विचार फक्त मालोजीराजांच्या मुखामधून निघाला , आपले स्वामी मात्र अंतर्यामी राजाच्या मनातला भेटीचा हेतू स्वामींना उमगला…स्वामी भर राजदरबारात मालोजीराजांचा समोर येऊन साक्षात अवतरले….स्वामींच्या अशा साक्षात्काराने संपूर्ण सभा अचंबित झाली त्याचबरोबर राजाची बुद्धीही थोडा वेळ गुंगली  , सिंहासनाखाली येऊन राजाने स्वामींना लोटांगण घातलं आणि दिव्यत्वाची प्रचिती आल्याने राजांच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू तरळू लागले राजांचे डोळे प्रेमाच्या अश्रुनी भरले , त्याच अश्रुनी स्वामींचे चरण धुतले गेले राजांनी अगदी कवेत घेऊन स्वामींच्या पायांना मिठी घातली , नंतर राजांनी स्वामींना हाताने पकडून आसनावर विराजमान केले .    

           याठिकाणी मालोजीराजांना अगदी अंतःकरणात स्वामींच्या दिव्यत्वाची खुण पटली , स्वामींच्या फक्त चरणस्पर्शाने नास्तिकपणा लांब पळून गेला आणि भक्ती जडली ती स्वामींच्या चरणी . हे दृश्य पाहून संपूर्ण सभा आनंदून गेली , स्वामींची त्यादिवशी मालोजीराजांच्या हस्ते षोडषोपचारी पूजा झाली . ज्याला कुठलाच असा आकार नाहीय , जो निर्विकार आहे ज्याला कुठलाच विकार स्पर्शू शकत नाही तो आज आपल्या भक्तांसाठी सगुण स्वरूप झाला त्यांच्या पादुका मस्तकी घेऊन नाचण्याचा योग आलाच तर हर्षवायू होऊन जाऊ .   

            प्रेमळ भक्तांची निर्मळ भक्ती याठिकाणी अशीच अखंडपणे सुरु राहोत याच भक्तांची निरपेक्ष भक्ती असलेला हा तिसरा अध्याय नेहमीप्रमाणे गोड व्हावा .

===================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *