
हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध नवमीचा दिवस हा प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो. श्रीराम हे हिंदू धर्मियांचे आदर्श आणि लाडके दैवत. जगकल्याणासाठी, दुष्टांच्या निर्दालनासाठी भगवान श्री विष्णूंनी पृथ्वीतलावर दशावतार घेतले. त्यातील भगवान श्रीराम हा विष्णूंचा सातवा अवतार आणि श्रीरामचंद्राच्या युगाला त्रेतायुग असेही संबोधतात.
अयोध्या नगरीचा राजा होता दशरथ….त्यांना ३ राण्या होत्या. कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. त्यांना एकच दुःख होते कि आपल्या ह्या राजगादीला वारस नाहीत. आपल्याला पुत्रसंतान व्हावे म्हणून राजा दशरथाने पुत्रकामेष्ठी यज्ञाचे आयोजन केले होते. राजा दशरथाच्या यज्ञाने अग्निनारायण प्रसन्न झाले आणि त्याने राजाच्या हातात चार फळे प्रसाद म्हणून दिली. तो प्रसाद त्याने आपल्या तिन्ही राण्यांना घेण्यास सांगितला. मग तिन्ही राण्यांना चार पुत्ररत्ने प्राप्त झाली. त्यापैकी कौशल्या आणि राजा दशरथाच्या पोटी रामाचा जन्म झाला.
श्रीराम हे रामायणाचे नायक. एक आदर्श पुत्र,पती ,बंधू ,स्वामी, धर्मरक्षक आणि उत्कृष्ट प्रजापालक. श्रीरामांची महती सांगाल तेवढी कमी. लहानपणीच श्रीरामांनी गुरूंच्या यज्ञाचे संरक्षण केले. वनवासात रावणासारख्या महा दैत्याचा संहार केला. त्याचबरोबर पतीच्या शापाने शिळा झालेल्या अहिल्येचा चरण स्पर्शाने उद्धार केला आणि तिला शापमुक्त केले. श्रीरामांना मर्यादापुरुषोत्तम असेही संबोधले जाते. भगवान श्रीरामांचे जीवन, त्यांची कर्त्यव्यनिष्ठा, औदार्य, पत्नीवचनी, निस्वार्थपणा ,न्याय, नीती, धर्मचरण असे असंख्य गुण वाखणण्यासारखे आहेत.
म्हणूनच “असा आदर्श राजा कधीही होणे नाही” असे म्हणतात. रामनवमीचे औचित्य साधून दुपारी बारा वाजता रामजन्माचा पाळणा म्हटला जातो.चैत्र तृतीयेपासून रामायणाचे पठण केले जाते. कथा, कीर्तने केली जातात आणि सर्व भाविकांना प्रसाद म्हणून सुंठवडा वाटला जातो.
रामायणाचे सार थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न….
अयोध्या : आपला देह
राजा दशरथ : आपली पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय
राणी कौशल्या : हि दहा इंद्रिये बहिर्मुख असतात. कौशल्यपूर्वक त्यांना अंतर्मुख करावे लागते.
राम : जेव्हा राम प्रकट होतात तो दैवीप्रकाश असतो.
सीता : आपले मन, माया आणि मोह
रावण : आपला अहंकार, गर्व आणि ताठा
लक्ष्मण : सजगता आणि प्रकाश
हनुमान : प्राण शक्तीचे प्रतीक
भगवान श्रीरामांनी प्राण आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या हनुमानांच्या खांद्यावरून, आपली सीता म्हणजेच आपले मन, माया आणि अहंकाररूपी रावणाच्या तावडीतून सोडवले आणि अशा प्रकारे रामायण आपल्या देहातही घडत असते.
ह्यावर्षी रामनवमी दि. १० एप्रिल, २०२२ ह्या दिवशी साजरी केली जाईन.
===============
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा

सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.