खरंच आयुष्य किचकट असते का ??

motivational articles : आयुष्य किती गुंतागुंतीचे आणि किचकट असते ना. जगणं ही एक कला आहे आणि ती कला अवगत झाली पाहिजे तर आणि तरच जगण्याचा आनंद लुटता येतो. खरंय अगदी खरंय. पण हे आयुष्य जगत असताना आपल्याला असे काही अनुभव देत असते ना की परिस्थिती कशी हाताळावी याही पेक्षा ही अशी जगावेगळी परिस्थिती माझ्या नशिबी का ?? असाच प्रश्न मनात येतो. कधी कधी आयुष्य इतके अनपेक्षित वळण घेते ना ज्याची आपण स्वप्नातही कल्पना केलेली नसते.
जगण्याचा रादर जीवंत असण्याच त्रास होतो. हे बघण्याआधी आपण मेलो असतो तर बरं झालं असतं असं वाटतं. प्रत्येकाच्या आयुष्यातील निर्णय चुकतात. माणसं आहोत आपण. चुका तर होणारच. संत महात्मे चुकले, त्यांना कष्ट भोगावे लागले तर मग आपण तर अगदीच सामान्य माणसं आहोत. पण खरतर काही निर्णय चुकून चालत नाही. शिक्षण, नोकरी, करिअर, संगत, लग्न या गोष्टी खूप म्हणजे खूप महत्त्वाच्या ठरतात आयुष्य जगत असताना. यातील एक जरी निर्णय चुकला ना तर संपूर्ण आयुष्य चुकत जाते. हे आयुष्य पुन्हा सगळं नीट करण्याची संधी देत नाही आणि ती अपेक्षाही आपण करू नये.
या चुकीच्या निर्णयामुळे रोज आपल्याला नको असलेल्या गोष्टींना सामोरे जावे लागते, इच्छा नसतानाही बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, मन मारावे लागते. एक सल आयुष्यभर तशीच रहाते आणि काही चुकीच्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्या की ती सल मान वर काढते. मी असं केलं असतं तर ?? किंवा आयुष्याची काही वर्षे मागे जाता आल तर ?? अशा कधीच शक्य नसणाऱ्या शक्यता मनात यायला लागतात, खूपच त्रास होतो. कधी कधी तर आपण इतके हताश होतो की वाटत संपलं सगळं. आता सगळे रस्ते बंद झाले काहीच नाही होऊ शकत आता आपले.
हेही वाचा
हे करून तर पहा, आयुष्य सोपे वाटेल …
अशा परिस्थितीत काय करावे हे समजत नाही. पण कधी विचार केलाय का की इतका त्रास आपल्याला का होतो ?? कारण आपण तो करून घेतो. खरतर अशा वेळी जप, ध्यान, motivational speech किंवा व्हिडिओ बघायला हवेत, मोकळे करणारे संगीत ऐकायला हवे. पण डोक्यात इतके विचार असतात ना की हे सगळं लक्षातच येत नाही.
स्वाभाविक आहे असे होतेच आपले. आपल्याकडून चुका होणार, वाईट वाटणार, नैराश्य येणार अगदी स्वाभाविक आहे. पण जरा शांतपणे विचार केला तर लक्षात येईल की हा इतका मनस्ताप अशासाठी की हा त्रास आपल्याला आपलीच माणसे देतात म्हणून होतो. हो खरं आहे. बाहेरच्या अनोळखी माणसाला काय माहित आपल्या आतुष्यातील व्याप आणि अडचणी ?? आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांना आपलं मानतो , विश्वास ठेवतो अशीच लोकं जेंव्हा आपल्याला समजून घ्यायला कमी पडतात, आपल्या भावना समजून घेऊ शकत नाहीत, आपल्या रागामागे लपलेली काळजी जेंव्हा त्यांच्या लक्षात येत नाही आणि त्याच आपल्या लोकांसोबत मन मारून जगायची वेळ येते ना त्याचा त्रास सगळ्यात जास्त असतो. उगाचच साठवून ठेवलेला राग, तिरस्कार, रुसवे फुगवे, मान अपमान, कुरघोडी यामुळे आपले आयुष्य आपणच किचकट करतो. अशी परिस्थिती येते की गोष्टी सहन होत नाहीत आणि कोणाला सांगताही येत नाहीत.
खरतर आयुष्य किती क्षणभंगुर आहे. त्यात नवीन रोगांनी ते अजुनच बेभरवशी झाले आहे. आणि आपण किती छोटे, आखूड, कूंचीत विचार करून ते अजुनच अवघड करतो आहोत असे वाटत नाही का ??
त्यापेक्षा आपले मन थोडे मोठे ठेवले, विचार प्रगल्भ आणि वृत्ती समंजस ठेवली तर सगळेच सुखी राहू ना.
==================