मानाचा दागिना

प्रमोद ला त्याच्या धाकट्या भावाचा “फोन –आईची तब्येत ठीक नाहीये, डॉक्टर म्हणाले एक दोन दिवस काढले तरी खूप आहे तेव्हा ,जमेल तितक्या लवकर येण्याचा प्रयत्न कर…”
‘हो मी टूरवर आहे तिथूनच उद्या संध्याकाळपर्यंत पोचतो.’
प्रमोदने घरी बायकोला फोन लावला “हॅलो शुभा– राजू चा फोन —
” हो –इथे पण आला आहे,
मी इथूनच डायरेक्ट जायचं म्हणतो प्रमोद म्हणाला.”
तू ?तुला तर ,–असे कर तू दिवस वारापर्यंत तरी पोहच
“अरे नाही, शुभांगी बोलली”मी निघते आहे इथून .मुलींना त्यांच्या मावशीकडे पाठवते आहे.”
प्रमोद ला आश्चर्य वाटले, पण मनातून बरेही, कारण शेवटी आईची भेट घ्यायची इच्छा शुभाने दाखवली म्हणजे नंतर त्याला ह्या कारणांवरून ऐकायला नाही लागणार .
शुभांगी दुपारीच गावाला पोहचली . सासुबाईंची तब्येत खरंच खालावली होती .अन्न पाणी जात नव्हते.
गावात प्रमोद चा धाकटा भाऊ राजू त्याची बायको राधा व आई-बाबा असे राहत होते.
बाबा दोन वर्षांपूर्वीच गेले, प्रमोद व त्याची फॅमिली जवळच्या शहरात म्हणजे औरंगाबादला होते सुरुवातीला प्रमोद ची ही गावातच नोकरी होती पण मग त्यांनी खटपट करून शहरात बदली करवली शुभांगी त्याची बायको, व मुल असे तिथे राहत होते.
प्रमोद दुसरे दिवशी संध्याकाळी पोहोचले, गेल्या गेल्या आईच्या खोलीकडे धावले. कितीतरी दिवसांनी आईला आपण पाहत आहोत याची त्यांना जाणीव झाली.
आईचा हात हातात घेत त्यांनी आवाज दिला” आई— मी प्रमोद.
आईने महद् प्रयासाने डोळे उघडून पाहिले.डोळ्यात मुलाला पाहिल्याचा आनंद दिसत होता .
“तू आणि सुनबाई आला –तुम्हाला पाहिलं आता माझी काही इच्छा उरली नाही.
आई ,असे बोलु नको तू नक्कीच बरी होशील.
नाही रे तुला पहाय साठीच माझा जीव अडकला होता.तुला पाहिल आता काहीही नकोय.
एक काम कर, राजू राधा आणि,मुल ,,शुभांगी सर्वांना बोलव. सर्वजण घाबरून खोलीत जमा झाले .
आई म्हणाली” तुम्ही दोघं सख्खे भाऊ आहा प्रेमाने एकमेकांना संभाळून रहा “असे म्हणत आईने शेवटचा श्वास घेतला.
दिवस वार झाले तसे प्रमोद औरंगाबादला परत यायला निघाले.
“दादा मधुन मधुन येत जा राजु ने नमस्कार करून म्हंटले.”
शुभांगी अगोदरच निघून आली होती.मुलींना इतके दिवस बहिणी कडे एकटं सोडून नाही राहू शकत हे कारण पुढे करून .
प्रमोद ना पटलं नव्हतं पण वाद नको म्हणून ते व घरातले कोणीच काही बोलले नाही.
प्रमोद परत आले . त्यांना
शुभांगी चा मूड उखडलेला दिसत होता.
त्यांनी सहज म्हटले,” मुलींना गावांत आणल असतं तरआई लाही त्यांना शेवटच पहाता आले असते. बोलवून घ्यायला हवे होते.
“हो आई आम्हाला पण आजी ला भेटायचं होतं.”
तुला ही तेराव्या ला थांबायला हवे होते.
तेवढेच बोलायचं अवकाश की बॉम्ब फुटल्याप्रमाणे शुभांगीची बडबड सुरू झाली.
” का थांबायला हवे होते”
माझ्या काय मान? म्हणायला मी मोठी सून आहे पण वागताना कुठे वागणूक मिळाली ?
सगळं कौतुक राजू आणि त्याच्या बायको राधाच
म्हणजे काय? अग प्रसंग काय होता आणि कौतुक करायची ती वेळ होती कां? ते तिथेच राहणारेआहे.
” म्हणून काय झालं आपण नोकरी पायी राहत आहोत शहरात.
तरीही फोन आल्या आल्या धावत गेलो न?
तरी सासूबाईंनी मोठीचा मान दिला कां,? नाही ना, त्यांनी हातातले तोडे काढून दिलेत राधाला माझ्या समोर.
” कोणते तोडे त्यांचा काय संबंध आहे?”
नाही कसां? तुम्हा पुरुषांना काही कळतं नाही.
“तो पूर्वापार पिढी दर पिढी चालणारा दागिना होता, आणि त्याच्यावर घरातल्या मोठ्या सुनेचा हक्क असतो .
आईना त्यांच्या सासूने दिला होता.
मोठी सून म्हणून .
या हक्काने मला नको होता का द्यायला?”
पण नाही, माझ्यासमोर त्यांनी राधाच्या हातात घातले.
आणि राधा तीही काही बोलली नाही .
म्हणून च मला जावेसे वाटत नाही तिथे.
तुला काहीतरी दिलच असेल ना ? प्रमोद नी विचारले.
आणि लग्नात ही दिले न दागिने?
” दिल,– हो दिल, ही मोहन माळ दिली त्यांनी. हलकिशी
पण– मानाचा दागिना न देऊन माझा हक्क डावलला, मला खूप खूप अपमानास्पद वाटलं म्हणूनच मी निघून आले.
अच्छा हे कारण होय ?
“तुम्हाला काहीच वाटत नाही का हो?”
“वाटतं ना ,–खूप वर्षापासून वाटतंय पण तुला बोलून काय फायदा?
“काय वाटतं?”
“एक सांग तू तो मान म्हणजे “मानाचा दागिना” ज्याला म्हणते ,त्यासाठी तू काय केलं? “
“म्हणजे काय? तुम्ही मोठे ना भावांमध्ये या नात्याने मी मोठी सूनच नाही कां?
मग हा माझा मान नाही का हो ?
मोठेपणाचा मान मिळवण्यासाठी तू काय केले त्यांच्यासाठी,
हे बघ शुभा,मोठेपण फक्त वयाने मिळत नसते.
आठव जरा आपलं लग्न झालं तेव्हा मी गावातच नोकरीला होतो पण तुला तिथे राहायचे नव्हते ,स्वतंत्र संसार हवा होता म्हणून तू किती मागे लागली
होती.शेवटी मी बदली करून घेतली.
हो पण त्याने काय फरक पडला ?
त्यानंतर आणि आधी तुला कुठले देवधर्म कुळाचार पटत नव्हते. आईच्या प्रत्येक गोष्टीला तुझा विरोध.
नेहमी नेहमी म्हणायची मला नाही जमत.
” मग मला सवय नव्हती हो!”
” पण आई कुठे तुला एकटी कर म्हणत होती?
ती स्वतः करत असे तू फक्त थोडी मदत केली असती आनंदाने तर !?
मला नाही आवडत ते दिवस रात्र देव देव करण.
आणि दरवेळी गावाला जायचं म्हणजे किती खर्च?”
ते माझे ही आईबाबा होते या नात्याने मला ही काही आर्थिक मदत करायला हवी होती पण तू नेहमी मोडता घातला.
मोठा मुलगा ह्या नात्याने माझे ही काही कर्तव्य होते. पण जाऊ दे आता बोलून काय फायदा.
त्यांना काही गरज नव्हती राधा ही नोकरी करत होती.
एक वर्षी जेव्हा राजू चे लग्न झाले आई-बाबा दोघे इथे आले होते मी खूप आग्रह केला म्हणून.
‘ मग’.राहिले की पंधरा दिवस.’
त्या वेळी तुझे वागणे कसे होते ते आठव!
“तुम्ही मलाच बोला शुभांगी चिडून बोलली.
आई खरं तर देव घेऊनच येणार होती माझ्या स्वाधीन करायला पण तुझे वागणे पाहून फार दिवस न राहता दोघे परत गेले .
“अस काही मी वागले नाही!”
त्यानंतर राजू चे लग्न झाले. राधा ही तुझ्याच पिढीतली. नोकरी करत होती पण तरीही आपल्याकडील पद्धत म्हणून तिने तिला जसे जमत गेले तसे निभावले, आई बाबांचा मान राखला त्यांची शेवटपर्यंत सेवा केली.
कधी एका पैशाची मागणी न करता.
तुला आठवतं बाबांच आपरेशन होणार होते? पैशाची गरज होती पण तरीही तू मदत करायला तयार नव्हती,
अहो पण तेव्हा माझ्या भावाच लग्न होते मग त्या करता आपल्याला पैसे हवे होते.
त्या वेळी राधाने कर्ज काढून सोय केली..
आईबाबांना प्रत्येक वाईट चांगल्या प्रसंगी त्या दोघांनी साथ दिली.
, मग हा मान ,हा मानाचा दागिन्याची तीच खरी हक्कदार होती, तिला तो मिळाला. आता तरी मान्य कर.
“शुभा दागिने म्हणजे संपत्ती नव्हे, ती जबाबदारी असते एका पिढीकडून दुसऱ्या नव्या पिढीला सोपवलेली, राधाने ती योग्यता सिद्ध केली म्हणून तिला मानाचा दागिना आईने सोपवला” .
. बाकी संपत्ती म्हणशील तर बाबांनी आधीच मला घर घेताना रक्कम दिली होती तेव्हा आता ते घर राजूचे झाले .
प्रमोद चे बोलणे खरे होते. शुभदाला आपली चूक कळली होती .
मान फक्त मोठे झाल्याने मिळत नाही तो आपल्या वागणुकीतून सिद्ध करावा लागतो आणि तिथेच ती चुकली म्हणूनच मानाचा दागिना गमावून बसली….
—————————————–लेखन.. सौ.प्रतिभा परांजपे
==================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.