चला जाणून घेऊया हरिद्वार ऋषिकेश यात्रा विशेष | Haridwar Rishikesh information in marathi

१. हरिद्वार ऋषिकेश यात्रा (Haridwar Rishikesh information in marathi)
Haridwar Rishikesh information in marathi: आपल्या महाराष्ट्राला अनेक पवित्र आणि निसर्गाने नटलेल्या तीर्थक्षेत्रांची देणगी लाभलेली आहे. आपण नेहमी कुठे ना कुठे फिरायला जातो. रोजच्या धावपळीतून बदल हवा म्हणून, मोकळी हवा मिळावी म्हणून किंवा मनःशांती मिळावी म्हणून एखादा फेरफटका मारतो. मग हे ठिकाण जर निसर्गाने नटलेले, जागृत देवस्थान किंवा तीर्थक्षेत्र असेल आणि मनाच्या शांती बरोबरच दुःखातून आपली सुटका होणार असेल, पुण्य पदरात पडणार असेल तर मग दुग्धशर्करा योग होऊन जाईल.
आरतीचे बोल, घंटानाद, मंत्रजप , निसर्गसौंदर्य, धाडसी किंवा काहीतरी वेगळे करण्याची इच्छा पूर्ती, गंगा स्नानाचे पुण्य आणि मागेल ती इच्छा पूर्ण होण्याची खात्री जर एकाच ठिकाणी मिळत असेल तर ते ठिकाण म्हणजे “हरिद्वार ऋषिकेश”.
असे ठिकाण जिथे दारू, मांसाहार आणि प्लास्टिक पिशव्या यावर आजही बंदीच आहे आणि भारतातील पवित्र तीर्थक्षेत्रपैकी एक आहे. चला बघुया हरिद्वार ऋषिकेश बद्दल काही :
२. ऋषिकेश महत्त्व
ऋषिकेश हे उत्तराखंडमधील डेहराडून जिल्ह्यातील एक हिंदूंचे अतिशय पवित्र आणि महत्त्वाचे असे तीर्थक्षेत्र आहे. येथे मोठी नगरपालिका आणि तहसील कार्यालय सुद्धा आहे. खरतर हे गढवाल हिमालयाचे प्रवेशद्वार म्हणता येईल. तसेच ध्यानधारणा करण्यासाठी प्रसिद्ध असलेली जागतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. येथील आश्रमाच्या शांततेसाठी ही ऋषिकेश प्रसिद्ध आहे. उत्तराखंडच्या समुद्रसपाटीपासून १३०० फूट उंचीवर वसलेले ऋषिकेश भारतातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रपैकी एक मानले जाते.
हिमालयाच्या कुशीतील पर्वते आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले ऋषिकेश. मग तिथे शांतता लाभणार यात शंकाच नाही. असे म्हटले जाते की इथे ध्यान केल्याने मुक्ती मिळते त्यामुळेच दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने येथे ध्यान करतात, आश्रमातील शांतता अनुभवतात आणि मनः शांती मिळवतात. इथे भगवान विष्णूच्या पायापासून निघालेली ( उगम पावलेली ) गंगा नदी वहाते. ऋषिकेशला अजून एका गोष्टीमुळे महत्त्व प्राप्त झाले आहे आणि ती म्हणजे चारधाम म्हणून प्रसिद्ध असलेली प्राचीन पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्रे म्हणजेच केदारनाथ, गंगोत्री, यामुनोत्री आणि बद्रीनाथ यांचे हे प्रवेशद्वार आहे.
तसेच अजून काही महत्त्वाच्या कारणांसाठी ऋषिकेशला महत्व प्राप्त झाले आहे आणि ते म्हणजे एका प्रचलित कथेनुसर समुद्रमंथनाच्या वेळी जे विष निघाले होते ते भगवान शंकराने इथेच ऋषिकेशमध्ये प्यायले होते. शिवाय भगवान श्रीराम यांनी वनवासाचा काही काळ इथेच घालवला होता. ज्या लोकांचे त्यांच्या इंद्रियांवर नियंत्रण असते त्यांना आपण ऋषी म्हणतो आणि जिथे ऋषी सोबत देवतांचा निरंतर वास असतो ते ठिकाण म्हणजे ऋषिकेश.
३. ऋषिकेश मधील आकर्षणे
१. लक्ष्मण झुला
लक्ष्मण झुला म्हणजे गंगा नदीच्या एका कठापासून दुसऱ्या काठाला जोडलेले शहर. हा लक्ष्मण झुला १९९६ मध्ये बनवला गेला होता. असे म्हणतात की गंगा नदी ओलांडण्यासाठी लक्ष्मणाने हा झुला बनवलेला होता. हा झुला ४५० फूट लांब आहे. या झुल्याच्या जवळच लक्ष्मण आणि रघुनाथाचे मंदिर आहे. हा झुला शिवानंद आणि स्वर्ग आश्रमाच्या मध्ये बनवलेला आहे त्यामुळे याला शिवानंद झुला असेही म्हणतात.

२. त्रिवेणी घाट
त्रिवेणी घाट म्हणजे ऋषिकेशमधील अंधोळ करण्यासाठीचा प्रमुख घाट. अनेक भाविक मोठ्या संख्येने गंगेत डुबकी घेण्यासाठी इथे येतात. हिंदू धर्मातील मुख्य मानल्या जाणाऱ्या तीन नद्या म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वतीचा इथे संगम होतो. संगम म्हणजे या नद्या इथेच एकत्रित येतात. इथूनच गंगा नदी उजवीकडे वळते. इथे नियमित होणाऱ्या आरतीचा घंटानाद मंत्रमुग्ध करतो.
३. रिव्हर राफ्टिंग
तुम्हाला जर धाडस करायला आवडत असेल, साहसी प्रवृत्ती असेल तर ऋषिकेशमधील रिव्हर राफ्टिंग तुम्ही नक्कीच अनुभवायला हवे. येथील रिव्हर राफ्टिंग अनुभवण्यासाठी लाखो लोक इथे येतात. ऋषिकेशमध्ये काही मान्यताप्राप्त मार्गदर्शक आहेत जे राफ्टिंगसाठी चांगली सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देतात. त्यासाठी काही ठराविक रकमेचे पॅकेज ठरवले जाते.
हेही वाचा
जाणून घ्या त्र्यंबकेश्वरला गंगा नदीचा उगम कसा झाला?
४. हरिद्वार घाट (Haridwar Ghat)
उत्तराखंडमधील जिल्ह्याचे ठिकाण असलेले हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हिंदूंच्या सात पवित्र तीर्थक्षेत्रपैकी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे हरिद्वार. पर्वत शिखरापासून ३१३९ मीटर उंचीवर हे ठिकाण वसलेले आहे. हरिद्वारचे स्त्रोत गोमुखपासून २५३ किमी प्रवास करून गंगा नदी हरिद्वारमध्ये प्रवेश करते. म्हणूनच याला गंगाद्वार असेही म्हणतात. हरिद्वार या शब्दाचा अर्थ देवाचे द्वार असा आहे, हरी म्हणजे देव आणि द्वार म्हणजे दार म्हणून हरिद्वार.

५. हरिद्वार इतिहास आणि महत्त्व
हरिद्वार या क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. कारण समुद्रमंथन वेळी इथे अमृताचे काही थेंब पडले होते. हे अमृत चार ठिकाणी पडले होते, उज्जैन, हरिद्वार, नाशिक आणि प्रयाग. त्यामुळे दर तीन वर्षांनी एका ठिकाणी असे नंबरने अशा प्रकारे दर बारा वर्षांनी इथे महाकुंभ आयोजन होते. ज्या ठिकाणी हे अमृत पडले होते त्याला हर की पौडी म्हणजेच ब्रह्मकुंड म्हणतात. शिवाय धार्मिक तीर्थक्षेत्र असण्याबरोबरच एक औद्योगिक केंद्र मानले जाते. हरिद्वारल गंगाद्वार, मायाक्षेत्र, मायातीर्थ, सप्तस्त्रोत, कुब्जाम्रक या नावांनी ओळखले जात असे. हरिद्वार हे नाव पौराणिक काळात प्रचलित झाले आणि कायम राहिले.
हरिद्वारचे अख्यान सांगणारा किंवा ऐकणारा हजारो गाईंचे दान तसेच अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ प्राप्त करतो.
इथे एक रात्र राहिल्याने हजार गाईंचे दान, सप्तगंग, त्रिगंग आणि शक्रावर्तत पितृश्राद्ध करणाऱ्याला पुण्यालोकात जाता येते.
६. हरिद्वार येथील आकर्षणे
१. मनसा देवी मंदिर ( Mansa Devi Haridwar)
हे मंदिर हरिद्वारपासून फक्त तीन किमी अंतरावर बिलवा पर्वतावर वसलेले आहे. लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. या देवीला देवी पार्वतीचे रूप मानले जाते. असे म्हणतात की येथील मंदिरात मागितलेली इच्छा नक्कीच पूर्ण होते. त्यामुळेच खूप दूरवरून लोक इथे येतात. हे मंदिर जवळ असल्याने हरिद्वारपासून येथे चालत जाता येते. जर चालणे टाळायचे असेल तर रोपवे मार्गे जाता येते.
२. चंडी देवी मंदिर
गंगानदीच्या पूर्व किनाऱ्याला भगवान शंकराच्या नीलपर्वत शिखरावर हे मंदिर आहे. हे मंदिर खूप प्रसिद्ध असून काश्मीरचा राजा सुचत सिंह याने इ. स. १९२९ मध्ये बनवले. एका कथेनुसार शुंभ निशुंभ या राक्षसाच्या सेनानायक म्हणजे चंड मुंडाना देवीने याच ठिकाणी मारले म्हणूनच या जागेचे नाव चंडी देवी असे पडले. या देवीच्या प्रतिमेची स्थापना आठव्या शतकात आदीशंकराचार्य यांनी केली. चंडीदेवी सोबतच संतोषी माता आणि हनुमान मंदिर पण आहे. या ठिकाणाहून अत्यंत जवळून मोर पाहायला मिळतात त्यामुळे तेथील सौंदर्यात भर पडते.
३. गंगा नदीत स्नानाचे महत्त्व
हरिद्वारचे आणखी एक वैशिष्ट्य असे की भगवान विष्णूच्या चरणामधून प्रकट झालेली गंगानदी जेंव्हा हरिद्वारमध्ये आली तेंव्हा देवतांसाठी पण हे दुर्मिळ असे क्षेत्र बनले. जो व्यक्ती या गंगानदित स्नान करतो आणि भगवान विष्णूचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालतो तेंव्हा तो व्यक्ती दुःखाचा भागीदार होत नाही. त्यामुळेच हरिद्वार हे तीर्थक्षेत्र सगळ्या तीर्थक्षेत्रात श्रेष्ठ तसेच धर्म, काम, मोक्ष आणि अर्थाने पुरुषार्थ देणारे आहे. इथे स्नान केल्याने पुंडरिक यज्ञ केल्याचे फळ तसेच वंशाचा उद्धार होतो.
४. गंगा आरती वेळ
ऋतूमानाप्रमाणे आरतीची वेळ बदलते. तरीही साधारणपने रोज दोनदा आरती होते. सकाळच्या आरतीपेक्षा रात्रीच्या आरतीला खूप भाविकांची गर्दी असते. आरती, घंटानाद आणि मंत्रजप हा सोहळा अनुभव घेण्यासारखा असतो.
आरतीची वेळ:
सकाळी – ६:३० ते ७:००
रात्री – ६:०० ते ७:००

७. हरिद्वार ऋषिकेश यात्रेला कसे जाल?
हरिद्वारपासून ऋषिकेश हे उत्तरेत २५ किमी तर डेहराडून पासून ४३ किमी अंतरावर दक्षिण पूर्व भागात आहे. डेहराडूनवरून जाणाऱ्या अनेक गाड्या हरिद्वारला जातात. दिल्लीवरून आपण हरिद्वारला जाऊ शकतो. डेहराडून विमानतळ ते हरिद्वार हे अंतर ४० किमी आहे.
१. विमान :
ऋषिकेशपासून १८ किमी अंतरावर डेहराडून जवळ विमानतळ आहे. एअर इंडिया, जेट आणि स्पाईसजेट विमान दिल्लिशी जोडली गेली आहेत.
२. रेल्वे :
ऋषिकेशमध्येच रेल्वेस्टेशन आहे. हे रेल्वेस्टेशन मुख्य शहरापासून ५ किमी अंतरावर आहे. हे देशाच्या प्रमुख रेल्वे स्टेशनशी जोडले गेले आहे.
३. बस :
दिल्लीच्या काश्मिरी गेटवरून डिलक्स आणि खाजगी बस तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवा उपलब्ध आहेत. या बसेस दिल्ली आणि उत्तराखंडच्या अनेक शहरातून ऋषिकेश आणि हरिद्वारला जातात.
तर अशा या खूप पुण्य देणाऱ्या, मन:शांती देणाऱ्या तसेच पाप आणि दुःखातून मोकळे करणाऱ्या या यात्रेचा लाभ सर्वांनीच घ्यायला हवा.
===============