खाद्यपदार्थ कोणत्याही पद्धतीने संस्कारित केलेले असले तरीही ते टिकवलेल्या स्वरूपात दीर्घकाळ ठेण्यासाठी व्यवस्थितपणे गुंडाळून तसेच योग्य आवेष्टने वापरून विशिष्ट वातावरणात साठविणे अत्यावश्यक असते. योग्य आवेष्टनांमुळे खाद्यपदार्थांचे बाहेरील धूळ, घाण, कीटक, सूक्ष्मजंतू इत्यादींपासून संरक्षण होतेच पण त्याचबरोबर वातावरणातील आर्द्रता,ऑक्सिजन व विनाशकारी घटक यांचाही खाद्यपदार्थांवर परिणाम सहजासहजी होत नाही.काही आवेष्टने खाद्यपदार्थाचे बाहेरील उष्णता आणि प्रकाश यांपासूनही संरक्षण करतात.विविध खाद्यपदार्थांच्या आवेष्टनासाठी त्यांच्या गुणधर्मानुसार विविध बाबींचा विचार करावा लागतो त्यानुसार नवनवीन प्रयोगांमुळे अगदी साध्या आवेष्टनापासून ते खास पद्धतीने तयार केलेल्या आवेष्टनापर्यंत विविध प्रकारची आवेष्टने उपलब्ध आहेत
आवेष्टनांचा आणखी एक उपयोग म्हणजे खाद्यपदार्थ उत्पादकांपासून ते ग्राहकांकडे पोचेपर्यंत तसेच घरी आणून वापरेपर्यंत किंवा साठवून ठेवताना अशा आवेष्टनांमुळे सुरक्षितपणे हाताळता येतात. आवेष्टनांचा उपयोग करताना त्याची खाद्यपदार्थांचे परीक्षण करण्याची क्षमता, टिकाऊपणा, बाह्य स्वरूप, खाद्यपदार्थांवर होणारी त्याची रासायनिक प्रक्रिया या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. सामान्यतः काच,कथिलाच्छादित पत्रे,अलुमिनिअम,कागद यांपासून बनवलेले आवेष्टने खाद्यपदार्थांसाठी वापरली जातात. काचेच्या बरण्या आणि बाटल्या विविध आकारांच्या, विविध झाकणे वापरता येतील अशा रंगीत, बिनरंगीत, पारदर्शक, अपारदर्शक इ स्वरूपात उपलब्ध असतात.
काचेच्या बरण्यात व बाटल्यात खाद्यपदार्थ ठेवल्यास बरेच फायदे होतात.रासायनिकदृष्ट्या काचेचा कोणत्याही प्रकारच्या खाद्यपदार्थांवर काहीही परिणाम होत नाही त्यामुळे गंजणे व तत्सम क्रिया आणि त्यापासून खाद्यपदार्थांना होणार धोका काचेमुळे कमी होतो काच बाहेरील वायू व द्रव शोषून घेऊ शकत नसल्याने त्याच्यापासूनही खाद्यपदार्थांचे संरक्षण होते,काच स्वतः गंधहीन असल्याने खाद्यपदार्थांच्या स्वादाचे संरक्षण होते.अतिउच्च तापमानाला बहुतेक प्रकारच्या काचा फुटत असल्या तरी दूध,फळांचे रस,जॅम,जेली,शीतपेये.मद्य इ साठी वापरण्यात येणाऱ्या बरण्या प्रथम उष्णतेने निर्जंतुक करून स्वच्छ केल्या जातात मगच त्यात ते द्रव पदार्थ भरले जातात. काचेच्या पारदर्शकतेमुळे आतील खाद्यपदार्थ ग्राहकाला चटकन दिसून येतो आणि त्यावरून त्या खाद्यपदार्थाची स्वीकार्यता ठरविता येते. मात्र काच अल्पायुषी असल्याने काचेच्या बरण्या,बाटल्या वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते.
Post navigation

प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.