Skip to content Skip to sidebar Skip to footer

गृहप्रवेश

मनवा…एक अत्यंत साधी सुशिक्षित आणि गरीब घरातली मुलगी…१० वर्षाची असताना आपल्या आईला गमावून बसलेली…तरीही घरातली कामं करून आपलं स्वतःच शिक्षण पूर्ण केलं…वडिलांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच…राजाभाऊ काका एका  मेकॅनिकल कंपनीत कामगार होते…त्यांच्याच ओळखीने मनवाचं  लग्न जमतं…तीचं सासर अगदीच श्रीमंत नव्हतं पण खाऊन-पिऊन सुखी असलेलं कुटुंब होतं…सासरी…सासू-सासरे..दीर-जाऊ असं गजबजलेलं कुटुंब होत…मनवाचा नवराही खूप समंजस, एम.बी.ए  झालेला…आणि नुकताच एका मल्टि नॅशनल कंपनीत रुजू झाला होता..मनवा दिसायलाही गोरी, सडपातळ  अगदी गिरिधरला शोभेल अशी…दोघांचेही लग्न झालं अगदी साधेपणाने आणि विधिवत लग्न झालं…रीतीप्रमाणे मनवाचा गृहप्रवेश झाला…सगळ्यानी नव्या सुनबाईंचं कौतुक केलं…मस्त उखानाही घेतला मनवाने…सगळे पाहुणे त्यादिवशी घरीच थांबले… 

पहिल्याच दिवशी मनवाच्या सासूबाईंनी मनवाचा बिछाना मनवाच्या नणंदेच्या शेजारी घातला आणि स्वतःही  तिथेच झोपल्या ..लग्नामध्ये सगळ्यांचीच खूप दग-दग झाली असल्याने सगळ्यांचा डोळा पटकन लागला…रात्रीचे १२ वाजले होते…इतक्यात मनवाच्या सासूबाईंच्या छातीत जोरात कळ आली..आणि त्या घाबऱ्याघुबऱ्या झाल्या…दरदरून घाम फुटला होता त्यांच्या अंगाला…पहिल्या दिवशी मनवाला नवीन जागा म्हणून काही झोप लागेना. सासूबाईंची बऱ्याच वेळची चुळबुळ चालू होती. त्या सारख्या एका अंगावरून दुसऱ्या अंगावर पडत होत्या आणि थोड्या त्रासलेल्या आवाजात कऱ्हात होत्या. सुरुवातीला मनवाला वाटलं कि त्या झोपेत बरचाळत असतील पण मग बराच वेळ झाला म्हणून मनवा उठली आणि त्यांना शांत करायला गेली. सासूबाईंना तिने हात लावला तर तिला कळालं कि सासूबाईंना भलतंच काहीतरी होतंय.  

 प्रसंगावधान राखून तिने त्यांच्या छातीवर थोडस चोळलं नि त्यांचा हात आपल्या हातात घेऊन दिलासा दिला…सुनबाईंना पाहून सासूबाईंना थोडासा दिलासा मिळाला…मग मनवाने…गिरिधरला..सासऱ्यांना तातडीने बोलावून घेतले..सासूबाईंना तडक हॉस्पिटलाईज्ड करण्यात आलं…डॉक्टरांनी सांगितले की, ”कामाच्या अति तणावामुळे, दगदगीने त्यांना मायनर अटॅक आला..प्रसंगावधान राखून तुम्ही तातडीने हॉस्पिटलाईज्ड केलं म्हणून त्याचा जीव वाचला नाहीतर अँजिओप्लास्टी करावी लागली असती..काही दिवस त्यांना आमच्या निरीक्षणाखाली ठेऊ आम्ही…नंतर सगळ्या फॉर्मॅलिटीस पूर्ण करता येईल ..” 

इकडे घरी मात्र मनवाला खूप विचित्र परिस्थितीला सामोरं जावं लागलं…कारण लग्नासाठी म्हणून आलेले पाहुणे म्हणजे दुसरं तिसरं कुणी नाही गिरिधरच्या आत्या आणि माम्या…एकसारख्या कुजबुजत होत्या…’नव्या सुनेचा पायगुण काही चांगला दिसत नाही….आल्या-आल्या आपल्या सासूलाच धरलं की हिनं..बरोबर आहे स्वतःच्या आईलाही हिनेच खाल्लं वाटतं…अपशकुनी कुठली’ आणि कुजबुजणं कसलं होतं ते मनवाला ऐकू जाईल म्हणून मुद्दामच मोठ्याने बोलत होत्या…हे सगळं ऐकून मनवाच्या अश्रूंचा बांधच फुटला. आपल्या बेडरूममध्ये जाऊन ती ओक्सबोक्शी रडू लागली…तिच्या रडण्याचा आवाज सासऱ्यांनी ऐकला आणि मनवाला अगदी वडिलांसारखं समजावलं… 

सासरे   – मनवा…बाळा असं भरल्या घरात रडू नये..आणि हे पायगुण वैगेरे असं काही नसतं गं..तू एवढी शिकलेली आहेस…तरीही या सगळ्या भाकड कथांवर विश्वास ठेवते.. 

मनवा   – बाबा…अहो बाहेर ती सगळी पाहुणे माणसं..मलाच बोल लावतायत… 

सासरे   – बोलणाऱ्यांची तोंड थोडी धरता येतात…आज बोलतील अन उद्या गप्प बसतील…

 मनवा   – सासूबाईंची तब्येत ठीक आहे ना आता..? 

सासरे   – अगं…याच श्रेय तुलाच जात…आम्ही सगळे काल अगदी झोपेतच होतो…आम्हाला काहीही ऐकू आले नाही…पण पोरी..तू वेळीच तिथे पोहचली अन आम्हाला झोपेतून जागं केलं…म्हणूनच तर पुढे पटकन आम्ही हॉस्पिटलाईज्ड करू शकलो…तू नसतीस तर काय झालं असतं  गं… 

आपल्या सासऱ्यांचे दिलासादायक शब्द ऐकून मनवा रडायची थांबली आणि सगळ्यांच्या चहा-नाश्त्याची तयारी करू लागली…मनवाला हाताशी म्हणून तिच्या नणंदबाई होत्याच…म्हणून घरात कुठे काय-काय ठेवलंय हे सांगण्यासाठी मनवाला मदत झाली…कठीण परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे मनवाला लहांपणीपासूनच ठाऊक होते म्हणून सासूबाईंचं मार्गदर्शन नसतानाही तेवढ्याच खंबीरपणे सगळं अगदी नेटाने सावरलं.. ..दोन दिवसांनी सासूबाईंना डिस्चार्ज देणार होते…म्हणून काही दिवस मनवालाच घरातली धुरा सांभाळायची होती…सासूबाईंचा नाश्ता, दोन वेळेच्या जेवणासकट डबा देण्याचं कामं मनवाने अत्यंत चोखपणे पार पाडलं, त्यात कुठलीही कसर होऊ दिली नाहीत, त्याचबरोबर घरातल्या सगळ्या पै-पाहुण्यांचही मनवा करत होती…पायगुणाबद्दल टोमणे देणाऱ्यांची तर बोलतीच बंद झाली… 

 सासूबाई काही तासातच येणार होत्या असा निरोप मनवाला मिळाला तशी ती खूप लगबगीने कामाला लागली आणि दुपारचा स्वयंपाक, नाश्ता, केर-वारा, धुणी-भांडी सगळं उरकून मस्तपैकी आरतीचं ताट मनवाने तयार केलं…सासूबाई आत येणार इतक्यात भाकर-तुकडाच मनवाने त्यांच्यावरून ओवाळून टाकला…पायावर पाणी टाकले..हळदी-कुंकू लावून सासूबाईंना आत यायला सांगितलं…सासूबाई तर कौतुकाने आपल्या सुनेला न्याहाळू लागल्या. 

सासूबाई  – पोरी…अजून तुझ्या हातचा चुडा उतरला नाही…तो लगेच कामाला लागलीस की…खूप त्रास दिला मी माझ्या नव्या नवरीला…मला माफ कर गं पोरी.. 

मनवा     – सासूबाई…त्यात काय एवढं…मला आई नाही…तिला तर मी माझ्या लहानपणीच गमावलं…आता या आईला मला गमवायचं नाहीय…जमेल तेवढी मी तुमची काळजी घेईल… 

मनवाने सासूबाईंना घट्ट मिठी मारली. 

सासूसुनेच हे अनोखं नातं पाहून आलेले पाहुणे हरखूनच गेले…त्या सगळ्यांना वाटलं की सासूबाई काहीतरी पायगुणाबद्दल सुनेचा उद्धार करतील पण तसं काहीच झालं नाही …त्या पाहुण्यांच्या तोंडात नकळतपणे सासूबाईंनी चपराकच लावली

================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

1 Comment

  • Ranjana Rao
    Posted Jun 6, 2021 at 2:08 pm

    छान, झालाय episode. अंधश्रद्धा चूक असल्याचे व्यवस्थित व्यक्त झालाय
    ranjanarao.com वर शिक्षण त्या संबंधीचे विषय असतात.

    Reply

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.