बकुळा (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा_जाने_२२
©️®️ गौरी पटवर्धन
या वेळी जवळ जवळ 5 वर्षांनी माहेरी भरपूर दिवसांसाठी जात होते.लग्ना नंतर वरचेवर जाणे व्हायचे पण आता मुलं लहान असल्यामुळे जाणे कमी झाले होते.गेले तरी राखी – भाऊबीज करून दोन दिवसांत परत.पण या वेळी चुलत भावाच्या लग्नासाठी 15 दिवस आले होते.आता मुलं ही समजायला लागली होती.माहेर कोकणात असल्याने मुलांना कोकण रेल्वे नी अनेक बोगदे पार करत करत निसर्ग सौंदर्य बघत बघत प्रवास करायला खूप मजा येत होती.हिरवा निसर्ग ,खळखळ वाहणार्या नद्या,उंच उंच डोंगर ,लाल लाल माती सगळं बघायला मिळत होतंस्टेशन वर मुद्दाम बैलगाडी मागवली होती खास मुलांच्या फर्माइशी वर.त्यांना रिक्षा नको होती.
आता येऊन दोन दिवस झाले ,लग्नघर, बरेच नातेवाईक खूप दिवसांनी भेटले , त्यामुळे दोन दिवस कसे निघून गेले कळलेच नाही.मग सगळ्यांचा मोर्चा आंबे फणसाच्या वाड्या पहायला जाऊन आला.नारळ , सुपारी ,केळी ,कोकम सगळं बघून मुलं अतिशय खुश होती.मग जरा गावच्या शिव मंदिरात जाऊन यावे म्हणून गेले.दर्शन करून मागे तलावाच्या काठावर बसले, तो निवांत पणा ,पक्षांचा किलबिलाट यामध्ये मी रंगली असतानाच अचानक तोच बकुळीच्या फुलांचा सुगंध दरवळला.
मी त्या सुगंधाने मोहरून गेले आणि एकदम आठवली ती माझी बाल मैत्रिण बकुळा.तसं तिचं नाव रसिका होतं ,पण ती आमच्या साठी तिच्या घरच्या झाडाची बकुळीची फुलं आणायची.ती वर्गात आली की बकुळीचा सुगंध दरवळायचा म्हणून आम्ही तिला नांव दिले बकुळा .शिवमंदिरातील पुजारी काकांची मुलगी.त्यांना देवळा मागेच रहायला घर मिळाले होते.ती 1 वर्षाची असताना तिची आई वारली.लगेचच पुजारी काकांनी दुसरे लग्न केले.दुसरी आई सावत्र नावाला शोभेल अशी च निघाली.मुलीला आई हवी म्हणून लग्न केलं पण ती काही मिळाली नाही.उलट वडिल ही बायकोच्या शब्दाबाहेर नसायचे.’आई सावत्र आली की बाप ही सावत्र होतो ‘ हे श्री.व.पु.काळे यांनी वाक्य या दोघांना बघूनच लिहीलं की काय असं वाटू लागलं.
तिची सावत्र आई फार हाल करायची.लहान भावंडांना सांभाळणे,घरची साफसफाई करणे ,अशी दिवस भर कामं सांगायची , वरून मारपण द्यायची , शिळं अन्न जेवायला द्यायची , अभ्यास करायला वेळ ही नाही द्यायची.शिकून काय करणार आहेस , शेवटी चूल आणि मूलच ना हे तिचं ब्रीद वाक्य होतं.सुरूवातीला तिने आशेने वडिलांकडे पाहिले पण निराशा हाती लागल्यावर तिने नाद सोडून दिला.फी माफ होती म्हणून शिकू तरी देत होती. तरीही बिचारी हसतमुख असायची.अभ्यास पण मन लावून करायची.तिला माहीत होतं की शिकले तरच नशिब बदलेल.मी घरी आल्यावर आईला तिच्या बद्दल विचारलं ,प्रथम आई व काकूने उडवाउडवीची उत्तरे दिली.पण मी मागे च लागले तेव्हा तिने खरं सांगितलं ,तिने जे सांगितले ते ऐकून धक्काच बसला .तिने म्हणे दोन मुली पदरात असणार्या बिजवरा शी लग्न केलं.धक्का तर होता च पण उत्सुकता जास्त होती.कारण एवढा खोल विचार करणारी मुलगी असं उगीचच नाही करणार.या मागे निश्चित च तिचा काही तरी उदार विचार असणार असं वाटलं.अशी घाईघाईने निर्णय घेणारी ती नव्हती च.
दुसर्याच दिवशी तिचा पत्ता घेऊन तिला भेटायला गेले.त्या पत्त्यावर पोचले तर ते’ वात्सल्य ‘ नावाचे बाळघर होतं.अंगणात बरीच लहान मोठी मुलं खेळत होती.मला पाहून आई आई कोणी तरी आलय असं सांगत पळाली.एक दोन मोठी मुलं या या ,याना काकू असं म्हणत फाटक उघडू लागली.हाक ऐकून एक स्त्री बाहेर आली ,ती म्हणजे आमची बकुळा च होती.दोघी ही एवढ्या वर्षांनी एकमेकींना पाहून आनंदित झालो.आम्ही आगदी कडकडून भेटलो.दोघींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.चहा पाणी झालं , पारिवारिक चौकशी केली .आत्ता इकडे कशी आलीस वगैरे विचारून झालं.मग मी तिला तिच्या लग्नाचं रहस्य विचारलं.ती म्हणाली तू आपुलकीने विचारले म्हणून सांगते सगळं.बाकी सगळी जण टोमणे च मारतात.कुत्सित नजरेने पाहतात.हिच्यातच काही कमी असेल वगैरे अनेक अंदाज बांधतात.अर्थातच मी काही लक्ष देत नाही.
ती म्हणाली माझी आई आणि माझी अवस्था तुला माहित आहेच.आगं या एका सावत्र शब्दाने आई ची माया ,ममता कुठे जाते हेच कळत नव्हतं.मग मी ठरवलं,की अशा माणसाशी लग्न करेन ज्याला बायको पेक्षा त्याच्या मुलांना आईची गरज असेल .मग मी पेपर मध्ये अशी जाहिरात दिली की आई विना मुलांची आई व्हायचंय.अशा व्यक्ती बरोबर लग्न करायचं आहे की ज्याला बायको पेक्षा मुलांच्या आई ची गरज आहे. गरजूंनी संपर्क साधावा.आणि मी अशा माणसाशी लग्न केलं की खरच त्याच्या मुलींना आईच्या मायेची गरज होती.अवघ्या 5-3 वर्षाच्या होत्या गं दोघी.त्यांची आई कॅन्सर ने अचानक गेली.मला न मिळालेली ममता मी त्यांच्या वर लुटली.आज त्या मलाच आई समजतात.त्यांना मोठं करताना मला माझं आई शिवाय चं बालपण आठवतं.मी त्यांच्या च वयाची होऊन त्यांच्या बरोबर खेळते ,बागडते.त्यांना एक भाऊ हवा होता पण मी मला मूल होऊ दिलं नाही कारण कदाचित सख्खा सावत्र हा भेद माझ्या मनात निर्माण होईल.म्हणून मग आम्ही एक मुलगा दत्तक घेतला.ज्या अनाथालयातून मुलगा आणला ना ,तिथे अशी अनेक मुलं होती.तिथे ज्या अवस्थेत मुलं होती ना त्यांना पाहून मी पण अशा मुलांसाठी माझं ‘ वात्सल्य ‘ उभं केलं .आज 14 मुलं आमच्या वात्सल्याच्या सावलीत जगत आहेत.
एवढ्यात तिचा नवरा आला ,तिने ओळख करून दिली.तो ही तिच्या बद्दल खूप भरभरून सांगू लागला.म्हणाला सुरुवातीला मला विश्वास नव्हता.की अशी कोणी मुलगी तयार होईल.दोन तीन वेळा भेटलो तेव्हा तिची स्वतःची कथा ऐकली ,तिचे विचार हळूहळू मनाला पटू लागले.मग आम्ही लग्नाचा निर्णय घेतला.पण पहिल्या दिवसापासून ती बायको कमी आणि आई जास्त आहे.मुली सुद्धा त्यांच्या जन्मदात्रीला विसरून गेल्या.लहानच होत्या तशाही.मुलगा सुद्धा दत्तक घेण्याचा निर्णय सर्वस्वी तिचा च होता. मी खूप समजावलं की प्रत्यक्ष आई होण्याचा अनुभव तुलाही मिळायला हवा.तेव्हा ती म्हणाली मी एक आई म्हणून च तुमच्या शी लग्न केलं आहे.आज मीही तुमच्या समोर कबूल करतो की तुमच्या मैत्रिणीने मला माझ्या पहिल्या बायकोला विसरायला लावले.आज मी तिच्या बरोबर खूप सुखात आणि आनंदात आहे.एक दोन नव्हे तर 3+14मुलांचा बाप आहे.खरच खूप खूप समाधान दिसत होतं त्याच्या चेहऱ्यावर.
मी परत एकदा कडकडून मिठी मारली आणि तिला म्हटलं तू खरच बकुळा आहेस गं.तुझ्या वात्सल्याचा सुगंध सर्वत्र पसरला आहेस.तू माझी मैत्रीण आहेस याचा मला खूप अभिमान वाटतोय.अशा अजून काही बकुळा गोळा झाल्या नातर कोणी ही अनाथ राहणार नाही.आणि मी त्या बकुळ सुगंधाने न्हाऊन पुन्हा येण्याचं वचन देऊन तिचा निरोप घेतला.संपूर्ण रस्ता भर तिचाच विचार चालू होता.घरी जाऊन सगळ्यांना तिची बाजू समजावून देण्याचं ठरवलंअशी ही माझी बकुळा.
सौ.गौरी पटवर्धन बडोदे
गुजरात.
============================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.
हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते १२ फेब्रुवारी आयोजित करण्यात येणार आहे.
विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.
पहिला विजेता – १००१/-
दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी
तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी
बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.
ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com
फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/