
सत्यजित आपल्या आईच्या पायाशी बसून रडत असताना…म्हणाला…
सत्यजित – आई…का एवढा हट्ट करतेस तू …काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची…?
वीणाताई – बाळ….तू हट्ट करतो आहेस…मी नाही बाबा…मी काय बाबा मी आज आहे तर उद्या नाही…तुझं आयुष्य आहे अजून…ते एकट्याने नको काढूस एवढंच माझं म्हणणं आहे…एक शेवटची ईच्छा….
सत्यजित – शेवटची इचछा असं काही म्हणू नको ग आम्हाला हवीयंस तू …
वीणाताई – मी नकोशीय इथं नाहीतर माझ्या मताला किंमत असती….काहीतरी…
सत्यजित – काय पाहिजे तुला सांग…
वीणाताई – तू लग्न कर बस्स…
सत्यजित – [घराच्या छताकडे पाहतो ] ठीक आहे…पण माझी एक अट आहे…
वीणाताई – कुठली अट…?
सत्यजित – लग्न करून जी मुलगी या घरात येईल त्या मुलीशी माझा कुठलाच संबंध नसेल….
वीणाताई – म्हणजे असं काय अभद्र बोलतोस तेही दिवेलागणीच्या वेळेला…
सत्यजित – संबंध म्हणजे…कुठलाच संबंध नाही असं नाही…आमच्यात कुठल्याही प्रकारचे शारीरिक संबंध नसतील…मुलं-बाळ याचा विचार माझ्यासोबत तिच्याही मनाला शिवता कामा नये…म्हणजे या घरात तिला स्थान असेल पण मुलांना जागा नसेल तिच्या…
वीणाताई – सत्या…काय ? तिची आशा असेल मुला-बाळांची तर…
सत्यजित – तिनं माझ्या या मुलांना आपली मुलं समजावी…जर तीही इचछा नसेल तर एका अनाथाश्रमातून मुलाची व्यवस्था केली जाईल…कुठलाही भावनिक संबंध आमचा नसेल…हे मान्य असेल तरच मी लग्नासाठी उभा राहील…
वीणाताई – होऊ देत बाबा तुझ्या मनासारखं…
असं म्हणून सत्यजित आपल्या खोलीमध्ये जाऊन नर्मदेच्या तस्विरीसमोर उभा राहून बोलू लागतो- ‘नर्मदा मी विश्वासघातकी नाही हा…मला सगळं आईमुळे करावं लागतंय…पण मी मात्र तुझ्याशी एकनिष्ठ राहणार आहे माझं दुसरं लग्न झालेलं असतानाही…माझ्या दुसऱ्या बायकोकडे मी फक्त एक स्त्री आदर म्हणूनच नातं ठेवणार आहे…तुझा विश्वास आहे ना माझ्यावर…’ त्यादिवशी सत्यजित न जेवता तसाच बेडवर पडून राहिला…संध्याकाळचं जेवणं सगळ्यांबरोबर न घेता त्यादिवशी एकटाच बेडमध्ये नर्मदेच्या तस्विरीसमोर बसून जेवू लागला…घास घश्याखाली उतरतही नव्हता तरीही बळेच पोटात घास ढकलला…त्यादिवशी पूर्ण रात्र सत्यजित आपल्या नर्मदेच्या आठवणीत जागा राहिला…
दुसऱ्या दिवशी वीणाताई नेहमीप्रमाणे लवकर उठल्या…सत्यजित मात्र रात्री जागरण झाल्याने सकाळी लवकर उठू शकला नाही….कारण पहाटेच सत्यजितचा डोळा लागला होता…वीणाताई आपली सकाळची दिनचर्या आटोपून सत्यजितची वाट पाहू लागतात…काही वेळातच सिंधू आपल्या नेहमीच्या कामासाठी येते…
वीणाताई – सिंधू आलीस का ये…
सिंधू – व्हय बाईसाहेब…साहेबासनी विचारलं का ?
वीणाताई – म्हणूनच आज खूप खुश आहे मी…तुला पाच दिवसात एकही मुलगी भेटली नाही का ग…?
सिंधू – हे लईच अवघड काम आहे…ताईसाहेबावनी कशी काय घावल पोरगी…
वीणाताई – काही हरकत नाही…आता मला जे काही म्हणायचंय त्याला तू आडकाठी नको करुस…कारण मी जे सांगेन ते तुला ऐकावंच लागेल…
सिंधू – व्हय बाईसाहेब…तुमचं ऐकणं माझं कर्तव्य आहे…
वीणाताई – तुझ्या बहिणीची मुलगी आली नाही आज…
सिंधू – नाही हो बाईसाहेब…तीच इथं काय काम…तिला ना दुसरीकडं काम लागलंय…एका कंपनीत पावडर भरायचं काम भेटलंय तिला…
वीणाताई – तिला म्हणावं आता काम सोडून दे ते…
सिंधू – बाईसाहेब…घरी बसून काय करेल ती…हातावर पोट चालतंय घरात सगळ्यांचं…बाप दारुडा हाय तिचा…घरात कमावती फक्त मी आणि तिची आई कावेरी…ती आत्ता महिन्याभरापूर्वी लागलीय कामाला…
वीणाताई – सगळंच सांगून टाकलंस तू अगं ऐक तरी…
सिंधू – हा बाईसाहेब…माफी असावी…
वीणाताई – ऐक शांतपणे….तुझ्या बहिणीच्या मुलीला या घरची सून म्हणून यावं लागेल इथे…
सिंधू – कर्ककाययय….[भीतीने सिंधूची बोबडीच वळते ]
वीणाताई – का…नाही आवडणार तुला ती या घरची सून झालेली…
सिंधू – बाईसाहेब मस्करी करत आहात तुम्ही…पायातली वहाण पायातच शोभून दिसते…
वीणाताई – सिंधू…लग्नाचा विचार केलाच असेल कि तुम्ही तिच्या…कधी ना कधी करणारच आहात ना तुम्ही तीच लग्न…
सिंधू – बाईसाहेब प्रश्न तिच्या लग्नाचा नाहीय…
वीणाताई – मग…कसला प्रश्न आहे…लग्न नाही मग काय…?
सिंधू – बाईसाहेब पण तिनं हेच लग्न का करावं…?
वीणाताई – मला तरी असं वाटतंय…कारण तुमची गरिबी पाहून मी नाही सुचवत…खरंच ग मला पाहिजे या घराला शकू सून म्हणून…तुला काय अडचण आहे…
सिंधू – अडचण म्हणजे…आमची शकू आता दहावी होऊन गेली म्हणजे सोळा वय होऊन गेलंय तीच…अजून न्हाणं आलं नाहीय तिला…
वीणाताई – म्हणजे काय ते स्पष्ट बोल..
सिंधू – बाईसाहेब…शकूला गर्भाशयाची पिशवीच नाहीय…जन्मापासूनच…तिला पाळी नाही आली अजूनही..
वीणाताई – त्याचा इथे काहीही संबंध नाहीय…
सिंधू – असं कस नाही…तिला मुलं बाळ नाही होऊ शकत कधीच…!
वीणाताई – असू देत कि मग…मुलं बाळ जन्माला घालूनच संसार होतो का कधी…
सिंधू – अहो पण लोक काय म्हणतील…
वीणाताई – लोकांचं मला काहीच घेणं देणं नाहीय …तू जर या लोकांचं कारण सांगून दिलेलं वचन पाळणार नसशील तर…आमचा विश्वास तू तोडलास असं आम्ही समजू…आठवं तू मला तसं वचन दिल होत…
वीणाताई आपल्या मतावर जणू ठामच होत्या काहीही करून सिंधूला त्या शकुच्या लग्नासाठी मनवत होत्या-
सिंधू – बाईसाहेब…हिच्या आईबापास्नी पहिलं विचारू देत मला…
वीणाताई – विचार पण मला तुझ्याकडून खूप आशा आहेत…नाराज करू नकोस मला…
सिंधू – मी माझ्या बहिणीला या लग्नासाठी तयार करील…तुम्ही सत्यजितरावांचं तेवढं पहा…
वीणाताई – ‘ राव…’ [ वीणाताई हळूच पुटपुटतात आणि मनात समाधान आणतात ]
सिंधू आपल्या मालकिणीला आश्वासन देऊन आपल्या घरी निघून जाते…सिंधूच्या एका शब्दावरून वीणाताई अंदाज लावतात की…’ आतापर्यंत थोरले साहेब अशी हाक देणारी सिंधू अचानक ‘ सत्यजितराव ‘ असं म्हणून जाते…कारण अनावधानाने बोललेलं नेहमी मनातलं खरं असत हे वीणाताई सिंधूच्या बाबतीत आधीपासूनच जाणून होत्या…म्हणून एकादृष्टीने वीणाताई ८० % तरी समाधानी होत्या…बाकी २० % सिंधू आणि शकू यांच्यावर होत…सिंधू घरी गेल्यावर आपल्या बहिणीपाशी शकुच्या लग्नाबद्दल आपलं मन मोकळं करते….
कावेरी – काय ग एवढा घाम कसा ग फुटलाय तुला…?
सिंधू – पाणी आन पहिलं…शकू कुठाय…?
कावेरी – अगं येईल ती पहिलं सांग काय झालंय तुला कुत्रं मागं लागलं होत की काय…
सिंधू – शकुच्या लग्नाबद्दल बोलायचं मला…
कावेरी – बोल की…[खूप आनंद होतो ]
सिंधू – आमच्या मालकीणबाई आहेत ना त्यांनी मागणी घातलीय आपल्या शकुंतलेला…
कावेरी – काय सांगतीयास…मुलगा काय करतो …
सिंधू – [आपली नजर चोरत म्हणते ] तो मोठा बिसनेसमॅन आहे हाताशी नोकर-चाकर,गाडी,बंगला सगळं काही नीटनेटकं आहे…घरात आई असते…आई लई मायाळू हाय बघ…
कावेरी – मुलगा पाहिलास का तू पण ?
सिंधू – व्हय बाई…मी चांगलच ओळखते त्याला…आपली शकू अगदी राणीवाणी राहील बघ…
कावेरी – बाई मला ना या पैसेवाल्यांची भीतीच वाटते…कुणी मस्करी तर नाही ना केली तुझ्याशी…आणि काय ग आपल्या पोरीबद्दल सगळी कल्पना देऊन ठेवली आहे ना तू ….
सिंधू – [पुन्हा नजर चोरत म्हणते] अगं म्हणजे काय दिलीच आहे कल्पना सगळी…तू काळजी नको करू…
कावेरी – मला तुझ्यावर विश्वास नाही…ते काही नाही मला उद्याच्या उद्या मुलगा पाहायला जायचंय…
सिंधू – तुला ग कधीपासून एवढी तुझ्या लेकीची काळजी…कायम तर घालून-पाडून बोलायचीस तिला आत्ता लई पुळका आलेला दिसतोय तुला…
कावेरी – तू काहीतरी लपवतेय असं मला राहून-राहून वाटतंय म्हणून मी विचारतेय…काही झालं…कशी बी असली तरी माझी लेक आहे ग ती…मी तिच्याबद्दल वंगाळ कशी ग बोलू…आईच्या शिव्या कधी लागतात का आपल्या लेकराला…
सिंधू – ऐक तर मगं मी ज्याठिकाणी कामाला जाते ना त्या घरच्या मालकीणबाई नाही का…वीणाताई मुधोळकर यांचा एकुलता एक मुलगा…’ सत्यजित मुधोळकर ‘ एवढा कोट्याधीश मुलगा पाहिलंय मी तुझ्या पोरीला…
क्रमश :
Post navigation

प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.